खासदार सुजय विखे म्हणाले…लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णतः चुकीचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी 61 व आज 21 गावे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

आज पुन्हा 21 गावे लॉकलाऊन झाल्याने खासदार विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनावर टीका केली. ते म्हणाले, लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णतः चुकीचा आहे. अनेक वेळा यावर वाद-विवाद झालेले आहेत.

यावर अनेक वेळा प्रशासनाला निवेदनेही दिलेली आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरणावर भर दिला पाहिजे. गावांतील सर्वांचे लसीकरण कसे होईल या दृष्टिकोणातून प्रयत्न केला पाहिजे.

ज्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना लॉकडाऊनची अवश्यकता नाही. जिल्हाधिकाऱ्यांना कायद्याचे संरक्षण एवढे जास्त आहे की त्यांच्या पुढे कोणी काही करू शकत नाही.

लॉकडाऊन करून प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे, असा सल्लाही डॉ. विखे पाटील यांनी दिला.

दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढू लागला आहे. यामुळे प्रशासनाने देखील कठोर निर्बंध लावले आहे. यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आरोप- प्रत्यारोप सुरु आहे.