पाथर्डी- गाडीला पन्नास टक्के तिकीट जास्ती आहे. दिव्यांग अन् इतर कोणताही पास चालणार नाही. पासवाल्यांनी वसू नका. कंडक्टरची सूचना ऐकून अहिल्यानगर पाथर्डी मार्गावर प्रवासी आता त्रस्त झाले आहेत. स्थानिक पातळीवर साध्या गाड्या सोडण्याऐवजी पाथर्डी आगारातून स्लिपरकोच गाड्या सोडल्या जात असल्यामुळे प्रवाशांना जास्तीच्या तिकिट दरातून रोजच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
अहिल्यानगर ते पाथर्डी मार्गावर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. बारा बाभळी, मेहकरी, देवगाव, मराठवाडी, करंजी, तिसगाव, पाथर्डीला जाणारे व पाथर्डी वरून अहिल्यानगरला जाणारे प्रवासी, शेतकरी, सामान्य नागरिक., दररोज सकाळी संध्याकाळी ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. दर अर्ध्या- एक तासाला या मार्गावर फेरा गाडी आहे.

मात्र बहुतांश वेळा फेरा गाडी साधी नव्हे तर स्लिपरकोच सोडली जाते. या गाडीला सध्या गाडीच्या तुलनेमध्ये पन्नास टक्के पेक्षा अधिक तिकीट दर जास्त आहे. मुळात लांब पल्ल्यासाठी असणारी ही स्लिपरकोच गाडी स्थानिक फेरा मारण्यासाठी का पाठवली जाते. असा प्रश्न प्रवाशाला सातत्याने पडत आहे.
त्या गाडीमध्ये कसल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. मग तिकीट दर जास्ती का? लांब पल्ल्यासाठी या गाड्या पाठवल्या ऐवजी लोकल फेऱ्यासाठी पाठवून प्रवाशांना विनाकारण आर्थिक का देता? सर्व गाड्यांना चालणारे पास या गाड्यात का नाही चालत ? एखादी गाडी ठीक आहे,
परंतु सकाळी सकाळी लोकांना जायचे असताना, सलग दोन-चार स्लिपरकोच गाड्या एकापाठोपाठ एक याच मार्गावर का बरं पाठवल्या जात असतील? अशी विचारणा झाल्यावर साहेब पाठवतात असे सांगून वाहकांनाही निरूत्तर व्हावे लागते.
अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे स्लिपरकोच गाड्या अहिल्यानगर-पाथर्डी मार्गावर सतत पाठवून प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. स्थानिक पातळीवर साध्या बसेस सोडाव्यात अशी प्रवाशांनी सातत्याने मागणी करू नये.
पाथर्डी आगाराकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे प्रवाशांना जाणीवपूर्वक वेठीस धरल्याचा प्रकार अहिल्यानगर पाथर्डी मार्गावर सुरू असल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून दुसरी एसटी नसल्याने नाईलाजान प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत. एकीकडे एसटीच उत्पन्न कमी झाल्याची ओरड करायची अन् दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरायचे या धोरणामुळेच एसटी तोट्यात जात आहे.