दारिद्र्य हा जगातील सर्वात मोठा निषेधार्य रोग – माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  दारिद्र्य हा जगातील सर्वात मोठा निषेधार्य रोग आहे असे मनोगत जेष्ठ अर्थतज्ञ माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी आज व्यक्त केले.

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने देण्यात येणारे जीवनगौरव पुरस्कार नाशिक येथील के.के वाघ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना ( प्रकृतीच्या कारणाने ते उपस्थित नव्हते त्यांच्या वतीने हा पुस्कार डॉ अजिंक्य वाघ यांनी स्विकारला )

व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकराव रोहमारे यांना डॉ मुणगेकर यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील , कुलगुरु डॉ व्ही. एन. मगरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य कल्याणराव आहेर पाटील , कुलसचिव एस. आर वाळुंज यांच्या सह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व विभागप्रमुख उपस्थीत होते.

पुढे बोलतांना डॉ मुणगेकर यांनी जगात तिनशे कोटी लोक गरिबीचे जिने जगत आहेत, भारतात भौतिक सुविधा पुर्ण न होऊ शकणाऱ्या लोकांची संख्या २५ कोटीच्या घरात आहे. या गरीब माणसांसाठी सुरु असलेले प्रवरेचे कार्य निश्चित मोठे आहे.

हा विकासाचा लोणी पॅटर्न जागतीक पातळीवर युनिसेफ मध्ये मांडला गेला पाहीजे असे सांगत डॉ मुणगेकर यांनी आपली आणि खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची वैयक्तिक मैत्री होती त्यांच्या विषयी माझ्या मनात कायम कृतज्ञतेची भावना असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी बोलतांना अशोक रोहमारे यांनी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या सहकार्याने आज पर्यत आम्ही ग्रामीण भागात अपंगांसाठीची संस्था चालवु शकलो आहे .लोकांनी केल्या मदतीवर अपंगांसाठीची आमची संस्था उभी आहे . हा पुरस्कार सर्व सहकाऱ्यांचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी बोलतांना कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रवासाचा आढावा घेतला, पुढील वर्षी पासुन नवे आयुर्वेद महाविद्यालय सुरु करत असल्याचे सांगत नागरिकांना अधिकच्या अरोग्य सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहीजे असे मनोगत व्यक्त केले.

तसेच कोविड साथीच्या काळात कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यामुळे आपण चांगले काम करु शकलो. यामुळे विद्यापीठाच्या विकासात मी नाही तर आपण आहोत म्हणून हे शक्य झाल्याचे सांगत सर्व घटकांचे आभार मानले.

या कार्यक्रमात ज्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पंचविस वर्ष संस्थेत पुर्ण झाली त्यांचा आणि ज्यांनी संशोधन , शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम केले आशा शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरु डॉ व्ही.एन. मगरे यांनी केले. तर आभार कुलसचिव डॉ एस. आर. वाळुंज यांनी मांडले.