आरटीई प्रवेश प्रकियेसाठी विद्यार्थ्यांना १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ, प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची लागणार लाॅटरी

Published on -

अहिल्यानगर- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया आता प्रतीक्षा यादीच्या टप्प्यावर आली आहे. पहिल्या सोडतीनंतर आता ज्या मुलांची नावं प्रतीक्षा यादीत आहेत, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पण या प्रक्रियेचा वेग खूपच मंदावला आहे. त्यामुळे शिल्लक जागांसाठी प्रतीक्षा यादीतील पालकांना आता १ एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर २ एप्रिलपासून दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला सुरुवात होणार आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यभरात १ लाख १ हजार ९६७ मुलांना पहिल्या सोडतीत प्रवेश मिळाला होता. यापैकी १३ मार्चपर्यंत ६९ हजार ७३५ मुलांचे प्रवेश निश्चित झाले.

पण तरीही बऱ्याच जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ३४८ शाळांमध्ये ३२२५ जागांसाठी ८९८९ अर्ज आले होते.

१० फेब्रुवारीला राज्यस्तरीय लॉटरी झाली आणि ३२२५ जागांची यादी जाहीर झाली. या लॉटरीत निवड झालेल्या मुलांना प्रवेशासाठी १३ मार्चपर्यंत तीन टप्प्यांत मुदत देण्यात आली होती. या काळात २३४१ मुलांचे प्रवेश झाले, म्हणजे ७३ टक्के जागा भरल्या गेल्या. ३३ अर्ज बाद झाले, पण तरीही ८५१ जागा रिक्त राहिल्या.

आता या ८५१ जागांसाठी प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्यात येत आहे. त्यासाठी १८ मार्च ते १ एप्रिल ही मुदत ठरली आहे. पण ऑनलाइन आकडेवारी पाहिली तर २६ मार्चपर्यंत एकाही प्रवेशाची नोंद झालेली नाही.

त्यामुळे प्रतीक्षा यादीला पालक किती गांभीर्याने घेतात, हा प्रश्नच आहे. शिक्षण विभागाने पालकांना सांगितलं आहे की, त्यांनी एसएमएसची वाट न पाहता आरटीई पोर्टलवर जाऊन आपल्या मुलाच्या प्रवेशाची स्थिती तपासावी आणि प्रवेश निश्चित करावा. तरीही पालकांचा प्रतिसाद कमी दिसतोय.

प्रतीक्षा यादीच्या पहिल्या टप्प्यात १८ ते २४ मार्चदरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू होती. पण अनेक मुलं प्रवेशापासून वंचित राहू नयेत म्हणून शिक्षण विभागाने ही मुदत १ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या नियोजनानुसार, प्रतीक्षा यादीतून प्रवेशासाठी एकूण चार फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे २४ मार्च ते १ एप्रिल ही मुदतवाढ ही शेवटची संधी ठरणार आहे. पालकांनी आता तरी जागरूक राहून आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करावा, नाहीतर ही संधी हातातून निसटू शकते.

या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट स्पष्ट होते की, लॉटरी लागली तरीही पालकांचा वेग कमी आहे. काहींना माहितीच मिळत नाही, तर काही जणांकडे वेळ नसतो.

आता प्रतीक्षा यादीतून मुलांचं नशीब आजमावलं जाणार आहे. पण त्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला तरच ही संधी त्यांच्या मुलांना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!