सततच्या रिमझीम पावसाने खरीप पिकांची पुरती वाट लावली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हात तोंडाशी आलेले पीक वाया चालली आहे. यातच पावसाचा मोठा फटका नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील बसला आहे.

यामुळे बळीराजा आर्थिक हतबल झाला आहे. नेवासा तालुक्यातील चांदा-बर्‍हाणपूर परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके आडवी झाली आहेत.

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे कृषी विभागाने करून शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. तालुक्यात सुरु असलेल्या सततच्या रिमझीम पावसाने खरीप पिकांची पुरती वाट लावली.

नगदी पीक असलेल्या कापूस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. कपाशी पिकांचे पन्नास टक्के नुकसान गत आठवड्यातच झाले होते.

रिमझीम पावसाने कपाशीची तळाची आधीच बोंडे सडली होती तर दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसाने उरलीसुरली कपाशीही गेली असल्याने बळीराजाचे यंदा मोठे नुकसान झाले आहे.

सणासुदीच्या काळात बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून आता पीककर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न बळीराजापुढे उभा ठाकला आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून बळीराजाला मदतीचा आधार द्यावा,अशी मागणी होत आहे.