अहमदनगर मधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा मुद्दा, पिंपरी चिंचवड येथील रोहित्राचा स्फोटातील मृतांच्या वारसांना मदत व मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने जामखेड मधील नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू. या तीन महत्वाच्या मुद्द्यांकडे आमदार प्रा. राम शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधले.

जामखेड शहरातील जुन्या डी. जे. हॉटेलच्या पाठीमागील भागातील एका घरावरून गेलेल्या मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मे२०२३ च्या चौथ्या आठवड्यात घडली होती. या घटनेवरून आमदार प्रा राम शिंदे यांनी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नाला लेखी उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे की, सदर घटना खरी असून जामखेड शहरातील मुख्य वीज वाहिनी इतरत्र हलविण्याबाबत जामखेड उपविभागात नागरिकांनी निवेदन सादर केले आहे.

मयत मुलीच्या कुटुंबियांना महावितरणातर्फे तातडीची मदत देण्याकरीता महावितरणचे कर्मचारी गेले असता त्यांनी सदर रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. ११ के. व्ही. वीज वाहिनीमुळे अपघात टाळण्याकरीता तातडीची उपाययोजना म्हणून सद्यःस्थितीत जामखेड शहरातील अरुंद रस्त्यालगत असलेल्या ११ के. व्ही. वीज वाहिनीकरीता कोटेड कंडक्टरची व्यवस्था करण्यात आली असून सदर काम २ ते ३ दिवसात पूर्ण करण्यात येईल. असे म्हटले आहे.

राज्यातील शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या वीज वाहक ताराबाबत म्हटले आहे की, वीज ग्राहकांना उच्च दर्जाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी महावितरणच्या धोरणानुसार राज्यात महावितरणच्या क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्ती आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स अंतर्गत प्रत्येक स्तरावर महावितरणच्या सुचिबध्द कंत्राटदाराकडून दुरुस्तीची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी करण्यात येतात. त्यामुळे संभाव्य ब्रेकडाऊन किंवा वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे तसेच अपघात होण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.