मित्राच्या फोनवरून केला भूकंपाचा ‘फेक कॉल’ प्रशासनाची उडाली धांदल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : तालुक्‍यातील वरवंडी येथे आता भूकंप झाला असून २० ते २५ जण जागेवर ठार झालेत, तर ५० ते ६० जण गंभीर जखमी झले आहेत. प्रशासनाची ताबडतोब मदत पाठवा, अशी खोटी माहिती प्रशासनाला फोनवरून मिळाल्याने पोलीस प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राहुरी तालूक्यातील वरवंडी येथील एका तरूणाने त्याच्या एका मित्राचा मोबाईल घेऊन पोलीस मुख्यालयातील ११२ नंबरवर कॉल करून सांगीतले,

की वरवंडी येथे आताच मोठा भूकंप झालाय. त्यात २० ते २५ जण जागेवर ठार झाले, तर ५० ते ६० जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस प्रशासनाची ताबडतोब मदत पाठवा, अशी माहिती मिळताच मुख्यालयातून राहुरी पोलिसांना माहिती देण्यात आली.

त्यामुळे काही काळ जिल्ह्यातील पोलिस प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. राहूरी येथील पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी भगवान थोरात, भाऊसाहेब शिरसाठ, चालक लक्ष्मण बोडखे आदींच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली; मात्र तेथे गेल्यानंतर हा कॉल फेक असल्याचे त्यांना दिसून आले.

वरवंडी येथे असा कोणताच प्रकार झाला नाहो, असे समजल्यावर पोलिस प्रशासन सुटकेचा सुस्कारा सोडला. ११२ नंबरवर कॉल आलेल्या नंबरचा शोध घेण्यात आला. कॉल करणारा तरूण हा वरवंडी येथील असून त्याने त्याच्या एका मित्राच्या मोबाईलवरून ११२ नंबरवर कॉल करून खोटी माहिती दिली होती. अशी माहिती पोलिस सूत्रांकडून समजली आहे.

पोलिस पथकाकडून त्या दोन्ही तरूणांचा शोध सुरू असून त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे काही काळ पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. या बाबत पोलिस कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्‍त केला जात आहे.