विद्यमान लोकप्रतिनिधींनी निकृष्ट कामाच्या माध्यमातून ठेकेदारी पोसण्याचे काम चालवले आहे ; माजी आ.चंद्रशेखर घुले यांची टीका

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : माझ्या पाच वर्षाच्या तुलनेत मागील दहा वर्षात झालेले काम बघितले तर आपणाला मोठा फरक दिसून येईल. मी केलेल्या कामामुळे नागरिकांना आजही मूलभूत सुविधा मिळत आहेत. तर आताच्या लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचाराचे कुरण निर्माण करुन निकृष्ट कामाच्या माध्यमातून ठेकेदारी पोसण्याचे काम चालवले आहे. अशी टीका माजी आ.चंद्रशेखर घुले यांनी आ. मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळत टीका केली.

आगामी विधानसभेसाठी शेवगाव पाथर्डी मतदार संघातून माजी आ.चंद्रशेखर घुले इच्छुक असून त्यांनी मतदार संघात परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत चांगलेच वातावरण ढवळून काढत आहेत.

तालुक्यात परिवर्तन जनसंवाद यात्रेच्यावेळी ते जनतेशी संवाद साधताना घुले म्हणाले की, मतदारसंघातील लोकांनी मला एकदा संधी दिली तर पन्नास वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावली. माणिकदौंडी येथील विद्युत उपकेंद्र करून दुर्गम परिसरातील वाडी, वस्ती व तांड्यापर्यंत वीज आणली. पटेल वाडा तलावाची गळती पूर्णपणे थांबवून व उंची वाढवून पाण्याची साठवण क्षमता वाढवली. दरी डोंगरात रस्त्यांचे जाळे निर्माण केले.

मात्र सध्या तालुक्यात प्रशासनावर कुठलाही अंकुश नाही. कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. तर दुसरीकडे विकास कामांच्या नावाखाली गरज नसलेली व तांत्रिकदृष्ट्या अपयशी ठरणारी कामे जनतेच्या माथी मारण्यात येत आहेत. अशा बेजबाबदार कार्यपद्धतीतुन स्वतःला मिरवून घेण्याचे उद्योग सध्या मतदारसंघात चालू असून, प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही.

यामुळे जनतेला कोणीही वाली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा मला संधी द्या विकास कामांचा राहिलेला अनुशेष भरून काढू असे माजी आ. घुले म्हणाले. दरम्यान विविध गावातील पदाधिकाऱ्यांनी आ. राजळे यांच्या विषयी नाराजी व्यक्त करत माजी आ. घुले यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याचा आग्रह केला.

तसेच या भागातील अनेक जेष्ठ नागरीकांनी देखील नाराजी व्यक्त करत अनावश्यक व चुकीच्या अनेक कामाबद्दल अनेकदा लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या. मात्र त्यांनी आमच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केले.

पाझर तलावाची मागणी केलेली असताना गरज व आवश्यकता नसलेली कामे मंजूर करण्यात येत आहे. याचे गौडबंगाल अजूनही आम्हाला उमजत नाही. यामुळे गावाची प्रगती थांबुन अधोगतीच होत आहे. अशी खंत व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe