फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समिती कायद्यान्वये कारवाई करू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- हंगाम २०२१-२२ सुरु झाला असून काही व्यापारी बाजार समितीचा परवाना न घेता शेतकऱ्यांना जादा भावाचे आमिष दाखवून शेतमालाचे अवैधरित्या खरेदी व्यवहार करीत आहेत.

असे आढळल्यास फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समिती कायद्यान्वये कारवाई करू, अशी माहिती सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली. व्यापारी विनापरवाना शेतमालाचा व्यवहार अप्रमाणित कोऱ्या पावती पुस्तकाच्या आधारे करीत असल्याचे संगमनेर बाजार समितीच्या निदर्शनास आले आहे.

बाजार समिती बाहेरील व्यवहारास कायदेशीर आधार नसल्याने शेतकरी वर्गाची फसवणूक होणार आहे. बाजार समितीत विक्रीस आणलेला शेतमाल फक्त परवाना धारक व्यापाऱ्याला खात्री करुन द्यावा.

अनधिकृत व्यापारी १०-२० रुपये जास्त भावाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करुन फसवणूक करु शकतात. यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.

अवैध व्यापारी असे कृत्य करताना आढळल्यास बाजार कायद्यान्वये कारवाई होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी शेतमाल ग्रेडिंग करुन विक्रीसाठी बाजार समितीत आणावा.

शेतमाल विक्रीनंतर आडत, व्यापाऱ्यांकडून रितसर काटा व हिशोब पट्टी घ्यावी. कोऱ्या पावत्या घेऊ नका, असे आवाहन बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी केले आहे.