शेतक-यांविषयी कळवळा दाखविणा-या आघाडी सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना वा-यावर का सोडले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-   महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या आविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही महाविकास आघाडी सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे.

एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने जनतेचे लक्ष विचलीत करण्‍यासाठी महाराष्‍ट्र बंद करण्‍यात आल्‍याचा आरोप भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. उत्‍तर प्रदेशातील शेतक-यांविषयी कळवळा दाखविणा-या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना वा-यावर का सोडले असा सवालही उपस्थित केला.

नैसर्गिक आपत्‍तीमुळे संकटात साडपलेल्‍या शेतक-यांना मदतीच्या कोरड्या आश्वासनांपलीकडे सरकारने काहीही दिलेले नाही. निसर्ग आणि तोक्‍ते वादळात नुकसान झालेल्यांना सरकारने जाहीर केलेली मदतही अजून पोहोचलेली नाही. पीक विम्याच्या लाभही शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही.

कर्जमाफीची योजना जाहीर झाल्यानंतर सरकार प्रोत्साहन अनुदान देणार होते त्याचे काय झाले याकडे लक्ष वेधून,रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालेली जनता अजूनही मदतीची वाट पाहात असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.

यापुर्वी भाजप बरोबर सत्‍तेत असतांना बांधवार जावून हेक्‍टरी ५० हजार रुपयांच्‍या मदतीच्‍या केलेल्‍या मागणीचाही सोईस्‍कर विसर शिवसेनेला पडला असल्‍याकडे त्‍यांनी लक्ष वेधले. लखीमपूर खेरीमध्ये काय झाले, त्यावर काय कारवाई करायची ते पाहण्यास उत्तर प्रदेश सरकार सक्षम आहे.

ही घटना दुर्दैवी आहे,या घटनेचे समर्थन होवूच शकत नाही, पण महाराष्ट्रात रोज शेतकऱ्यांवर मरण ओढवत असताना त्यावर मात्र ठाकरे सरकार चकार शब्द बोलत नाही याचे आश्‍चर्य आ.विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले. लखीमपूर खेरीवर बोलणारे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे तीनही मंत्री,

नेते संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात फिरकतही नाहीत आणि मंत्रिमंडळात मात्र लखीमपूर घटनेवर राजकारण केले जाते, हा केवळ राजकीय स्टंट आहे. ज्यांच्या मेहेरबानीमुळे ठाकरे सरकार अस्तित्वात आले, त्या काँग्रेसची खुशामत करण्यासाठी राज्यातील संकटग्रस्तांना वेठीस धरू नका, असा इशाराही आ.विखे यांनी दिला.

राज्यातील सत्ताधारी नेते, सनदी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची हजारो कोटींची प्रकरणे बाहेर येत आहेत. आयकर खात्याने अधिकृतपणे हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. जनतेस तोंड दाखवायला जागा न राहिलेले अनेकजण चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी पळापळ करत आहेत, आणि नवी प्रकरणे बाहेर येऊ लागल्याने अनेकजण धास्तावले आहेत.

आपल्या भ्रष्टाचारावर आणि नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी लखीमपूर प्रकरण महाराष्ट्रात पेटवून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा सरकारचा डाव आहे. सरकार राज्यातील जनतेसाठी काहीही करू शकत नाही, हे महाविकास आघाडी सरकारने आपल्या नाकर्तेपणातून सिद्ध केले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

राजकारण करून जनतेचे लक्ष समस्यांपासून दूर नेता येईल, पण त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाया थांबविता येणार नाहीत. दररोज नव्या भ्रष्टाचाराचे दाखले समोर येत असल्याने, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून ठाकरे सरकारची होणारी नोंद पुसता येणार असे सूचक भाष्य करून .

अगोदरच कोरोनाकाळात कंबरडे मोडलेल्या महाराष्ट्रात बंद पुकारून जनतेला अधिकच हलाखीत लोटण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले असल्याची टिका विखे यांनी केली.