आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणी वाढल्या ! ‘या’ प्रकरणात न्यायालयात हजर रहावेच लागणार…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात मतदारांना खोटे आश्‍वासन देऊन व दिशाभूल करुन अहमदनगर एमआयडीसी येथील आयटी पार्क कार्यान्वीत केल्याचे सांगणारे आमदार संग्राम जगताप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात खाजगी दावा दाखल केला होता.

दिनांक 24/11/2021 रोजी जिल्हा मुख्य प्रधान न्यायधिश यांच्या समोर या अर्जावर सुनावणी झाली असता जिल्हा मुख्य प्रधान न्यायधिश यांनी आमदार संग्राम जगताप व त्यांचा प्रचार करणारे तरुण दिपाली शामसुंदर वर्मा,सोनाली रवींद्र भरताल,देवेंद्र अशोक वैद्य,संतोष क्षेत्रे,हरीश भोगाडे यांना कोर्टात हजर होऊन बाजू मांडण्याची नोटीस पारित केली.

सामजिक कार्यकर्ता संदीप भांबरकर यांनी माहिती अधिकारात एमआयडीसी कार्यालयाकडे आयटी पार्कची माहिती घेतली असता, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांच्या 26 ऑक्टोबर 2016 च्या परिपत्रकान्वये अहमदनगर औद्योगिक क्षेत्रातून आयटी पार्क वगळण्यात आला आहे.

तर ती जागा इतर उद्योजकांना भाडे तत्वावर देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले होते.यावरुन आमदारांनी स्वयंघोषित आयटी पार्क उभे करुन मतदारांची जाहिरनाम्याद्वारे दिशाभूल केली असल्याचा आरोप भांबरकर यांनी केला होता. त्याविषयी त्यांनी जिल्हा न्यायालयात पुराव्यानिशी दावा दाखल केल्या होता.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली. त्यांनी जाहीरनाम्यामध्ये आयटीपार्क सुरु केला असल्याचे दर्शवले. तर युवक-युवतींना आयटी पार्कमध्ये रोजगार उपलब्ध करुन दिल्याचे जाहीर केले.

काही तरुण-तरुणींनी व्हिडिओद्वारे आयटी पार्क चालू झाला असून, आंम्हाला रोजगार मिळाल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते भांबरकर यांनी आयटी पार्कबद्दल माहिती घेतली असता शहरात आयटी पार्कच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी माहिती अधिकार 2005 अन्वये एमआयडीसी कार्यालयाकडे आयटी पार्क विषयी माहिती मागितली.

त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाला आपल्या मार्फत परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती त्यांना 10 ऑगस्ट रोजी मिळाली. त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहमुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांचे परिपत्रक 26 ऑक्टोंबर 2016 अन्वये अहमदनगर औद्योगिक क्षेत्रामधील आयटी पार्क वगळण्यात आला आहे.

सदर आयटी पार्कची जागा इतर उद्योजकांना भाडेतत्वावर देण्यात आली आहे. या पत्रावरुन आमदार जगताप यांनी सर्व मतदार व नागरिकांची दिशाभूल केली असल्याचे भांबरकर यांनी याआधी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते.आमदार संग्राम जगताप यांनी जाहिरनाम्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून, तसेच निवडणूक प्रचारात आयटी पार्क चालू केला आहे असे खोटे सांगितले आहे.

प्रचारादरम्यान व्हिडिओद्वारे नोकरी मिळाली असे सांगणारे युवक-युवती यांनी देखील फसवणूक केली असल्याचे भांबरकर यांचे म्हणने होते. यावरुन आमदार व खोटी माहिती सांगणारे युवक-युवतींवर गुन्हे दाखल करण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यात आला होता.

मात्र पोलीस स्टेशनने हा अर्ज स्विकारला नाही. यानंतर पोलिस अधिक्षकांकडे तक्रार अर्ज देण्यात आला. त्यावर कारवाई झाली नसल्याने जिल्हा न्यायालयात खाजगी दावा दाखल केला होता.

त्यावर दिनांक 24/11/2021 रोजी जिल्हा मुख्य प्रधान न्यायधिश यांच्या समोर सुनावणी झाली असता जिल्हा मुख्य प्रधान न्यायधिश यांनी आमदार संग्राम जगताप व त्यांचा प्रचार करणारे तरुण दिपाली शामसुंदर वर्मा,सोनाली रवींद्र भरताल,देवेंद्र अशोक वैद्य,संतोष क्षेत्रे,हरीश भोगाडे यांना कोर्टात हजर होऊन बाजू मांडण्याची नोटीस पारित केली..