गेल्या 24 तासात जायकवाडी जलाशयात 1.3 टिएमसी नवीन पाणी दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- गेल्या मागील 24 तासात जायकवाडी जलाशयात 1.3 टिएमसी नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे शनिवारी सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार 79.73 टक्के पाणीसाठा झाला होता.

हा उपयुक्तसाठा 80 टक्क्यांच्या जवळपास आहे. अजुनही पावसाचा अंदाज जाणकार व्यक्त करत असल्याने या जलाशयातील साठा अजुन फुगणार आहे.

दरम्यान पावसाने उघडीप दिल्याने धरणांमधून विसर्ग कमी प्रमाणात सुरु आहेत. यंदा गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने 15.6 टिएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे.

जायकवाडीच्या मुक्त पाणलोटातील पाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने यंदा जायकवाडीत चांगले पाणी दाखल झाले. नाशिक जिल्ह्यातील धरणांचे उपयुक्त साठ्यांची टक्केवारी सरासरी कालच्या तारखेला 93.68 टक्के इतकी होती.

दारणा, भाम, भावली, वालेदवी, गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, कडवा, आळंदी ही धरणे 100 टक्के भरली आहेत. दरम्यान दारणातून कालपर्यंत 8.2 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

काल या धरणातून 550 क्युसेकने विसर्ग सुरु होता. गंगापूरमधून यंदा 1.5 टिएमसी विसर्ग करण्यात आला. काल या धरणातून 285 क्युसेकने विसर्ग सुरु होता.