बळीराजा हवालदिल… अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला असून, कापूस, संत्रा, केळी, पपई, ज्वारी, मका, हरबरा आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आह़े

नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटी सुरु आहे.

यामुळे जवळपास दोन लाख हेक्टरवरील पिकमालाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे.

तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना देखील अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जालना, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील ६० हजार हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून हातातोंडाशी आलेली जिरायत आणि बागायती पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या सर्वच ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यावर नेमके किती नुकसान झाले आहे, याची माहिती मिळेल आणि त्यानुसार मदत दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.