कोरोनामुळे लग्नावर आधारित व्यवसाय संकटात; बँडवाल्यांवर उपासमारीची वेळ ओढवली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोरोनामुळे गेल्या अनेक सहा महिन्यांपासून राज्यासह देशांमध्ये लॉकडाऊन असताना संपूर्ण लग्नसराईवर विरजण पडले होते. त्यामुळे बँडवाले,घोडेवाले,लाइटिंगवाले यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

शासनाकडे निवेदने सादर करूनही कोणतीही दाखल घेतली जात नसल्याने आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या या कलाकारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. गेल्या दोन वर्षापासून करोनाचे संकट निर्माण झाल्याने व शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सण उत्सव यावरही याचा मोठा परिणाम झाल्याने याचा थेट परिणाम तालुक्यातील बँड पथकातील कामगारांवर झालेला आहे. तालुक्यातील 130 बँड बॅन्जो पथकातील सुमारे दोन हजार कामगारांना कामच मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे अनेक व्यवसाय बंद होते.

लॉक डाऊनही प्रदीर्घ काळ सुरू होते. शासनाने कठोर निर्बंध घातल्याने अनेकांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमावरही शासनाने निर्बंध आणल्याने या समारंभाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या व्यवसायांवर गंभीर परिणाम झाला आहे. अशीच परिस्थिती संगमनेरात निर्माण झाली आहे.

बँड पथक, ढोल ताशा पथक, बॅन्जो पथक यांना एकेकाळी मोठा व्यवसाय असायचा. यामुळे हा व्यवसाय तालुक्यात चांगला फोफावला होता. तालुक्यात सध्या 130 बॅन्जो पथके अस्तित्वात आहेत. एका पथकात पंधरा ते वीस कामगार काम करत असतात. असे सुमारे दोन हजार कामगार या व्यवसायात कार्यरत आहेत.

मात्र करोनामुळे हे व्यवसाय जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कामच नसल्याने 2 हजार कामगारांचा रोजगार बुडाला आहे. अनेकजण केवळ याच व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र या व्यवसायातून सध्या रोजगार नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

बॅन्जो, बँड पथकासाठी गणेशोत्सव हा सुगीचा काळ असतो. मात्र या उत्सवावरच सरकारने निर्बंध आणल्याने गणेश प्रतिष्ठापनेची मिरवणूक व विसर्जन मिरवणूक दोन वर्षांपासून बंद झाली आहे. यावर्षीही विसर्जन मिरवणूक निघणार नसल्याने बॅन्जो पथकाचा हा व्यवसाय बुडाला आहे.

या कामगारांना शासनाने आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी या क्षेत्रातील संघटनांनी वेगवेगळ्या अधिकारी व पदाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मात्र या कामगारांची कोणीही दखल घेतली नाही. शासनाकडून या कामगारांना कुठलाही आर्थिक मदतीचा हात दिला नाही. यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.