DICGC Insurance : अनेकजण मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा बँकेत ठेवतात. बँक त्या पैशांवर गुंतवणूकदारांना व्याजही देत असते. परंतु, काही नामांकित बँका बुडत आहेत. त्यामुळे आता या गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या पैशांची काळजी सतावत आहे.
काही बॅंकेच्या ग्राहकांना आपले पैसे मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच आता या गुंतवणूकदारांना दिलासा देणारी एक बातमी आहे. कारण केंद्र सरकारने डीआयसीजीसी कायद्यात महत्त्वाचा बदल केला आहे. काय सांगतो नियम जाणून घ्या.
नवीन नियमानुसार, बँकेत जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला पाच लाख रुपयांची हमी दिली जाते. हा नियम लागू होण्यापूर्वी ग्राहकांना बँकेत जमा केलेल्या पैशांवर एक लाख रुपयांची हमी मिळत असे.
केंद्र सरकारने 2020 मध्ये, ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायद्यात बदल करून बँक ठेव हमी पाच लाख रुपये केली आहे.
जर तुमची बँक डिफॉल्ट असेल तर तुम्हाला 5 लाख रुपये परत दिले जातील. तसेच ज्या बँक अडचणीत येतात, सरकार त्याला डिफॉल्ट करू देत नाही असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
सरकारकडून त्या बँकेचे मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्यात येते. आता नवीन नियमानुसार एखादी बँक बुडली तर खातेदारांना पैसे परत देण्याची जबाबदारी डीआयसीजीसीची आहे.