गोवंश हत्या रोखण्यासाठी मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तींनी लक्ष घालावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील संजयनगर, सुभाषनगर,बैल बाजार रोड इ.भागांत सातत्याने गोवंश हत्त्या चालू आहे.कायद्याने गोवंशहत्या बंदी असूनही दिवसरात्र गोवंश हत्या दिवसाढवळ्या होत आहे.त्यामुळे मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तीनी गोवंश हत्या थांबविण्यासाठी स्वतः लक्ष घालावे असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.

या वेळी वहाडणे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, शहरात रात्रंदिवस काही घरात सर्रासपणे गायींची कत्तल होऊन नाल्यात रक्त-मांस वहात असते.त्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले दिसते.शहराचे आरोग्य बिघडू नये म्हणून कोपरगाव नगरपरिषदेने जवळजवळ एक कोटी खर्च करून मनाई येथे आधुनिक मशिनरी बसवून अधिकृत कत्तलखाना (स्लॉटर हाऊस) उभारून दिले आहे.

तेथे म्हैस वर्गीय प्राण्यांची नियमानुसार कत्तल करण्याची परवानगी आहे.असे असतांनाही काही मस्तवाल खाटिक भरवस्तीत गोवंश हत्या करून कायदे धाब्यावर बसवतात.शहरात राहणाऱ्या हिंदू समाजाच्या भावनांची जराही दखल न घेता गोहत्या सुरूच आहे.

काही वर्षांपूर्वी याच भागात गोहत्या करणाऱ्या कसायांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर कसायांनी दगडफेक करून घंटागाड्यांची तोडफोड करून दहशत माजविली होती. शासन-प्रशासनाने अनेकदा कारवाया करूनही या आडदांड प्रवृत्तीच्या कसायांना काहीच फरक पडत नाही.

तीन वर्षांपूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी शासनाने याच भागांत शेकडो जनावरे(गाई बैल) व कित्येक टन गोमांस जप्त केले,तरीही हे गैरप्रकार थांबत नाहीत.त्यावेळी कोपरगावातील हिंदुनी समजूतदारपणा दाखवून शहरातील वातावरण बिघडू दिले नव्हते.

माझी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांना आवाहन आहे कि, तुम्ही गोवंश हत्त्या करणाऱ्याना समजावून सांगा.तुम्ही जर हिंदूंच्या भावनांची दखल घेतली नाही तर एखाद्या दिवशी तरी या बेकायदेशीर गोहत्यांमुळे शहरातील वातावरण बिघडू शकते.

शहरात हिंदु मुस्लिम समाजात कुठलाही तणाव नाही.शहरातील वातावरण बिघडू नये यासाठी संबंधितांनी-सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.कायदे नियम न पाळता गोवंशहत्या करणाऱ्याना वठणीवर आणले पाहिजे,

अन्यथा हिच प्रवृत्ती शहरातील वातावरण,कायदा सुव्यवस्था धोक्यात आणल्याशिवाय रहाणार नाही.याची सर्वांनीच गंभीर दखल घ्यावी असे नगराध्यक्ष वहाडणे यांनी सांगितले.