सर्वोच्च न्यायालयाच्या निकालान्वये देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवर पुजार्‍यांची मालकी आणि कब्जा यापुढे राहणार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- देवस्थान जमिनीच्या रेकॉर्ड ऑफ राईटला पुजार्‍यांच्या असलेल्या नोंदी रद्द करून मिळविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदच्या वतीने काळी आई मुक्तिसंग्राम करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने दिलेल्या निवाड्यात मंदिराने देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवर पुजारी किंवा देवासाठी काम करणार्‍या कोणाचीही नावे रेकॉर्ड ऑफ राईटला कब्जेदार, सदरी आणि मालक सदरी ठेवता येणार नसल्याचा निकाल दिला आहे.

यामुळे महाराष्ट्रातील हजारो गावांमधील लाखो एकर जमीन मंदिर आणि देवाचे मालकीचे पुजार्‍यांच्या नाव वरून काढून त्या देवाच्या नावावर करण्यासाठी काळी आई मुक्तिसंग्राम जारी करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मध्यप्रदेश सरकारने दाखल केलेल्या अपिलावर हा निवाडा नुकताच झाला आहे.

या निवाड्याचा फायदा महाराष्ट्रातील हजारो देवस्थानांना होणार आहे. देवस्थानच्या जमिनीवर पुजारी आणि इतर लोक स्वत:च्या नोंदी करून मालका प्रमाणे वागत आहेत.

तर देवस्थानला संध्याकाळी दिवा लावण्यासाठी सुद्धा पैसा मिळत नसल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन या संघटनांनी तातडीने गावांमधील कर्त्या ग्रामस्थांना संघटित करून हे आंदोलन चालवले जाणार आहे. यापुढे पुजारी फक्त नोकर किंवा व्यवस्थापकाच्या स्वरूपात मंदिरात राहू शकणार आहेत.

त्यामुळे देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवर पुजार्‍यांची मालकी आणि कब्जा यापुढे राहणार नाही. तर देवस्थानची मालकी आणि देवस्थानचा कब्जा अशा जमीनीवर राहणार आहे. भारतीय संविधानाचे कलम 141 नुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा हा संपूर्ण भारतातील देवस्थान जमीनींना लागू होत असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रातील जमीनी या देवस्थान वतन स्वरूपाचे असल्यामुळे त्याला कूळ कायदा लागत नाही. परंतु पुजारी आणि त्यांच्या वारसांनी अशा हजारो एकर जमिनीची विल्हेवाट आतापर्यंत लावली व कोट्यवधी रुपये बेकायदेशीरपणे मिळवले.

तर संपूर्ण गावाला वेठीस धरले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या आंदोलनासाठी ऍड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम यांनी पुढाकार घेतला आहे.