Samrudhi Highway : समृद्धी महामार्गालगत होणार नवनगरे ! शिर्डी आणि कोपरगाव परिसरातील नागरिक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samrudhi Highway  : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा म्हणून ओळख ठरलेल्या समृद्धी महामार्गामुळे भविष्यकाळात कोपरगाव तसेच शिर्डी येथे नवनगरे होणार आहेत. त्यामुळे या भागाला आगामी काळात अधिक उज्वल भविष्य राहणार आहे,

असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या वक्तव्यामुळे कोपरगाव व शिर्डी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कोपरगाव ते भरवीर या ८० किलोमीटर महामार्गाच्या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

ते म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे १५ जिल्ह्यांचा विकास साधला जाणार आहे. समृद्धी महामार्गाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सतत विरोध केला. छत्रपती संभाजीनगर तसेच अहमदनगर येथे जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध केला; मात्र तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोडून काढला.

अवघ्या नऊ महिन्यांत जमीन हस्तांतरणाचे काम पूर्ण करता आले. शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेतजमिनीचा योग्य मोबदला तात्काळ मिळाला, हा इतिहास आहे. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांची त्यामुळे खरी समृद्धी होऊ शकली.

कोपरगाव व शिर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी त्यासाठी मोलाची मदत दिली असल्याचा उल्लेख फडणवीस यांनी आवर्जून केला. समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी आपल्या वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा.

समृद्धी महामार्गावर चालण्यासाठी आपली वाहने फारशी चांगली नाहीत, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले. श्री मोदी यांनी समृद्धी महामार्गासाठी मोलाची मदत केली, तर ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी मोठी मेहनत घेतली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद करून दोघांचे कौतुक केले.