शिक्षकांना समाजात आजही तेवढाच सन्मान -आमदार संग्राम जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-  मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान झाला नाही. शिक्षकांनी कोरोनाच्या संकटकाळात फ्रंन्टलाईन वर्कर म्हणून कार्य केले. प्रत्येक क्षेत्रात शिक्षक योगदान देत आहे.

शिक्षकांना समाजात आजही तेवढाच सन्मान आहे. जिवंत असे पर्यंत शिक्षक हे मार्गदर्शकाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रवादी भवनमध्ये शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक व गुणवंत कर्मचारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी आमदार जगताप बोलत होते.

शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नागापूर सरपंच डॉ. सुभाष डोंगरे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ,

राष्ट्रवादी क्रीडा सेलचे घनश्याम सानप, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, मुख्याध्यापक संघाचे शहर जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव बेरड, प्राचार्य अशोक दोडके, अन्सार शेख, रघुनाथ ठोंबरे, विठ्ठल उरमुडे, सुभाष येवले, विठ्ठलप्रसाद तिवारी,

नंदकुमार हंबर्डे, शेखर उंडे, सूरज घाटविसावे, प्रसाद शिंदे, संजय चौरे, प्रशांत नन्नवरे, अविनाश विधाते उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात. भविष्यातील पिढी घडविणार्‍या शिक्षण क्षेत्रासंबंधी जागृक राहून आवश्यक सुविधा देण्याचे कार्य सुरु आहे.

डिजीटल पध्दतीने मुलांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी पाऊल टाकण्यात आले असून, शहराची त्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिनकर टेमकर म्हणाले की, काळानुरुप बदल स्विकारुन शिक्षकांना अपडेट व्हावे लागणार आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन स्वत:ची व विद्यार्थ्यांची प्रगती साधता येणार आहे.

विद्यादानाचे कार्य करणार्‍या शिक्षकांनी सतत शिकत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. सरकारी व मराठी माध्यमांच्या शाळांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी शिक्षकांनी बदलाच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. डोळ्यांनी न दिसणार्‍या एका व्हायरसने जगाचा कायापालट केला. अनेक क्षेत्रात बदलाचे वारे वाहत आहे.

शाळा बंद असल्याने मुलांना शिकवणे व सांभाळणे किती अवघड आहे? हे पालकांच्या लक्षात आले. इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना एवढी मोठी दिर्घ सुट्टी मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता देखील बदलली असून, त्यांना पुन्हा शाळेत रमवणे ही शिक्षकांसाठी अवघड गोष्ट राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. माणिक विधाते यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन कोरोना परिस्थितीमुळे शिक्षकांचा मोठ्या स्वरुपात शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. ही उणीव भरुन काढण्यासाठी, समाज घडविणार्‍या शिक्षकांचा सन्मान झाला पाहिजे. या भावनेने आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात विठ्ठल उरमुडे यांनी शैक्षणिक दृष्टीकोन असलेले आमदार शहराला लाभले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी आमदार निधी व लोकसहभागातून अनेक शाळांना ई लर्निंग संच भेट उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले.

पुरस्कार प्राप्त शिक्षक भारती कवडे, संजयकुमार निक्रड, अशोकराव दौडके यांनी आपल्या भावना व्यक्त करुन प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पुरस्कार देऊन दिलेल्या प्रोत्साहानाबद्दल आभार व्यक्त केले. ज्ञानदेव पांडूळे यांनी समाजात कर्तव्यनिष्ठेने कार्य करणारे शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांच्या कार्याची जाणीव ठेऊन घेतलेल्या पुरस्कार कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

आप्पासाहेब शिंदे यांनी माध्यमिक शिक्षकांना पुरस्कार मिळत नव्हता, मात्र राष्ट्रवादीने प्राथमिक, माध्यमिक विभागातील हिरे असलेल्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करुन त्यांच्या कार्याचा सन्मान केला असल्याचे सांगितले. ज्ञानदेव बेरड यांनी कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रासह जगामध्ये झपाट्याने बदल झाला.

शाळा बंद असल्या तरी, शिक्षण मात्र ऑनलाईन सुरु आहे. तंत्रज्ञानाच्या युगात नवीन शैक्षणिक धोरण सर्वांना स्विकारावे लागणार असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, अमोल कांडेकर, गणेश बोरुडे, लहू कराळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलप्रसाद तिवारी व संजय गोसावी यांनी केले. आभार बाबासाहेब बोडखे यांनी मानले.