अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला तीन महिने उलटून गेले आहेत. दरम्यान सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या.
मात्र, कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. हा कारवाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे.
मात्र, संपातील कर्मचाऱ्यांची कामावर हजर होण्याची संख्या स्थिरावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या, तरी त्यांनी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळून आता कामावर हजर होणे गरजेचे असतानाही संप सुरू ठेवला आहे.
त्यामुळे प्रवासीही वैतागले असून, आता राज्य सरकारनेही संप मिटविण्याची घाई करू नये, तसेच कर्मचाऱ्यांनीही मागणी मान्य होईपर्यंत कामावर येऊ नये,
आम्ही आमची सोय करू, असा उपरोधिक संदेश प्रवाशांमधून व्हायरल केला जात आहे. गेल्या तीन महिन्यांपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनामुळे एसटीची सेवा बऱ्याच ठिकाणी ठप्प झाली आहे. आजअखेरपर्यंत एसटीचे १ हजार १५७ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील काही बसस्थानकांमध्ये खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. त्याचा फटाका आगामी काळात एसटीला बसणार आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण १ हजार १५७ कर्मचारी विविध आगारांमध्ये कामावर हजर झाले.
यामध्ये प्रशासकीय ३६३, यांत्रिकी ३८०, चालक १८२, वाहक २१९, चालक तथा वाहक १३ कामावर हजर झाले आहेत. एसटी प्रशासनाने आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण २२२ जणांवर बडतर्फची कारवाई केली असून, ३०३ जणांचे निलंबन करण्यात आले आहे.
आकडे बोलतात
३६४० – एकूण कर्मचारी
२३१२ – गैरहजर कर्मचारी
११५७ – हजर झालेले कर्मचारी
१४२ – आठवडा सुट्टीवर असलेले
१५० – रजा व पगारी सुटीवरील
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम