Maharashtra : “हा काय पोरकटपणा, विनयभंग होतो तर गर्दीत जाऊ नका”; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी भडकल्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांना नुकताच जामीन मिळाला आहे तर आता पुन्हा त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गुन्हा दाखल होताच आव्हाड यांनी एक ट्विट करत सर्वांनाच धक्का दिला आहे.

या ट्विटमध्ये आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय असे लिहले असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या महिलेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

ऋता आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, त्या म्हणाल्या गुन्हा दाखल करणारी महिला भाजपच्या पदाधिकारी आहेत का?

त्या कधी भाजपच्या तर कधी राष्ट्रवादीच्या स्टेजवर असतात. छठपुजेच्यावेळी मुंब्र्यात टेन्शन होतं. या महिलेने त्यावेळी बाचाबाची केली होती. काही कारण नसताना बोंबाबोंब केली होती.

कारण नसताना त्यावेळी तिने आव्हाडांवर अर्वाच्य भाषेत कमेंट केली होती. त्यामुळे या महिलेच्या विरोधात गुन्हे दाखल असून ती आणि तिची मुलगी जामिनावर आहे. ती केस अजूनही सुरू आहे. त्यामुळे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा तिच्याकडे मोटीव्ह आहे, असे ऋता आव्हाड म्हणाल्या आहेत.

पुढे बोलताना ऋता आव्हाड म्हणाल्या, आव्हाड हे निवडणुकीला उभे राहिले हा त्यांचा निर्णय होता. राजीनामा देणे हा निर्णय सुद्धा त्यांचाच असेल. मी त्यावर बोलणार नाही. पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंब्रा-कळव्यात प्रचंड अराजक निर्माण होईल.

कोणी तरी रुपयावाला. एक रुपये चाळीस पैशावाला व्यक्ती एखाद्या माणसाला त्रास देत असेल आणि सरकार अशा लोकांना मदत करत असेल तर ते चुकीचे आहे, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी होती. सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता. अशा ठिकाणी कुणी कुणाला बाजूला केलं तरी कुणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या महिलेलाही गर्दीमुळे खांद्याला धरून बाजूला केलं असेल.

पण चार तासानंतर आपल्याला बाजूला केलं याची या महिलेला जाणीव कशी झाली? चार तासानंतर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय? हा काय पोरकटपणा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ऋता आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी कसे वागले पाहिजे हे मलाही कळते. कालच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी होती. तिथे आमच्या कार्यकर्त्याही खाली पडल्या. मग त्यांनी गुन्हा दाखल करायचा का?

आम्हाला मारहाण झाली असं आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं का? तुमचा विनयभंग होतो तर गर्दीत जाऊ नका. कोणी तुम्हाला जायला सांगितलं? असे सवाल त्यांनी गुन्हा दाखल केलेल्या महिलेला केले आहेत.