उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर देण्याच्या मागणीसाठी… तोडगा न काढल्यास महामार्ग रोको ! राजू शेट्टी यांचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रशासन यांच्यामध्ये मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी समन्वय बैठक होणार आहे. बैठकीत समन्वयाने तोडगा निघाला नाही तर रविवार, २६ नोव्हेंबरला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

मागील गळीत हंगामातील उसाला ४०० रुपये व चालू गळीत हंगामातील उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर-सांगली मार्गावर चक्काजाम आंदोलन केले.

हे आंदोलन तब्बल ४० मिनिटे केले. त्यामुळे जयसिंगपूर, शिरोली व वडगाव मार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनस्थळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, तालुकाध्यक्ष आप्पा एडके, माजी जि. प. सदस्या पद्माराणी पाटील, धुळाप्पा पुजारी, संदीप कारंडे, अमित पाटील, अॅड. सुरेश पाटील, अॅड. सुधीर पाटील, अॅड. संदीप चौगुले, अभय व्हनवाडे आदी उपस्थित होते.

आंदोलनस्थळी अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंकी, पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.