कोकणात होणार Greenfield Expressway मुंबई-सिंधुदुर्ग जोडणार समृद्धीच्या धर्तीवर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Greenfield Expressway : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आता कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई- सिंधुदुर्ग या कोकण ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाच्या आखणीस गुरुवारी मान्यता देण्यात आली.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील १८ तालुक्यांतून ३८८ किमी लांबीचा सहापदरी महामार्ग उभारला जाईल. या महामार्गामुळे कोकणातील दळणवळण गतिमान होऊन औद्योगिक विकास व पर्यटनास वाव मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) कडून ५५ हजार कोटींचा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग उभारण्यात आला आहे. आता त्याच धर्तीवर दुर्गम व दऱ्याखोऱ्यांचा असलेल्या कोकणचा औद्योगिक व पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड महामार्ग बांधण्याचे सरकारने निश्चित केले होते.

महामार्गावरील वेगमर्यादा १०० किलोमीटर !

त्यानुसार त्याचा आराखडा तयार करण्याचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू होते. अखेर गुरुवारी या आराखड्याला अंतिम मान्यता देण्यात आली. हा महामार्ग रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा या ६ तालुक्यांतून,

तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आदी ७ तालुक्यांतून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी अशा ५ तालुक्यांतून जाईल. हा ग्रीनफिल्ड महामार्ग नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे.

हा महामार्ग चार टप्प्यांत पूर्ण केला जाईल. पेण ते रत्नागिरी ९४ किमी, रत्नागिरी ते गुहागर, चिपळूण ७० किमी, गुहागर, चिपळूण ते राजापूर १२२ किमी आणि सिंधुदुर्ग जिल्हा ते पत्रा देवी असा १०१ किमी असा एकूण ३८८ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल. समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेऊन या महामार्गावरील वेगमर्यादा ताशी १०० किलोमीटर अशी ठेवण्यात येणार आहे.

असा असेल कोकण Greenfield Expressway 

■ रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे आणि १८ तालुक्यांतून जाणार.

■ लांबी : ३८८ किमी, सहापदरी.

■ पेण तालुक्यातील बलवली गावातून सुरू होणार

■ नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणार.

■ वेगमर्यादा : ताशी १०० किमी.

पर्यटन व औद्योगिक विकासात भर

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून कोकण विभाग हा पर्यटन, औद्योगिक व वाणिज्य कामांसाठी समृद्ध आहे.

गोवा तसेच कोकणातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या पर्यटकांची, नागरिकांची मोठी संख्या आहे.

हा महामार्ग झाल्यानंतर कोकणातील दळणवळण गतिमान होऊन पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.

सोबतच औद्योगिक वाढीलाही चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.