कारखान्यांनी ३५०० रुपये पहिली उचल न दिल्यास ऊसतोडी बंद पाडणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : जिल्ह्यात उसाच्या तोडी सुरू होऊन आठ दिवस झालेले असताना जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याने उसाची पहिली उचल अद्याप जाहीर केलेली नाही. जिल्ह्यातील साखर कारखान्यान्यांनी उसाला पहिली उचल ३५०० रुपये जाहीर करावी,

अन्यथा १४ नोव्हेंबर २०२३ पासून ऊस तोंडी बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने रवी मोरे यांनी दिली.

अध्यक्ष रवी मोरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोरे बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे डॉ. संजय कुलकर्णी, मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक तनपुरे, तालुकाध्यक्ष दिनकर पवार उपस्थित होते.

मोरे म्हणाले, की २०२३-२४चा गळित हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने उसाच्या भावाची कोंडी फोडलेली नाही, तरीही त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उसाच्या तोंडी सुरु केल्या आहेत.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, तसेच यावर्षी साखरेचे भाव वाढलेले आहेत, म्हणून आम्ही यावर्षी सर्व साखर कारखान्यांनी २ दिवसांत उसाला पहिली उचल ३५०० रुपये टनाप्रमाणे जाहीर करावी अन्यथा जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखानदारास उसाच्या तोडी होऊ देणार नाही, असा इशारा मोरे यांनी दिला.

जिल्हा मराठा महासंघाचे उपाध्यक्ष दिपक तनपुरे म्हणाले, राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली भागातील साखर कारखाने उसाला ३५०० रुपये टनाप्रमाणे उसाला पहिली उचल देतात, मग नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ३५०० रुपये टनाप्रमाणे उसाला पाहिली उचल देण्यास अडचण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.