महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक देणार दिल्लीला धडक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion News  : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले ४० टक्के शुल्क हटवावे, नाफेड व एनसीसीएफची कांदा खरेदी बंद करावी आणि उर्वरित कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट जमा करावे,

या प्रमुख तीन मागण्यांसाठी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दिल्लीत धडक देणार असल्याचा इशारा महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गानंतर आता शेतकरी कांदा प्रश्नावर आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गत सहा दिवसांपासून असहकार आंदोलन पुकारत कांदा लिलाव ठप्प केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, कोट्यवधींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सोमवारी सकाळी १० वाजता लासलगाव कांदा बाजारपेठ आवारात बैठक घेत संघटनेची भूमिका स्पष्ट केली. बैठकीस येवला, चांदवड, निफाड, नांदगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांनी हजेरी लावली.

गेल्या सहा दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प असल्याने नुकसान होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. शिवाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घामाचा भाव मिळाला पाहिजे,

ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण व्हायलाच पाहिजेत, अशी मागणी करतानाच, एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना सरकार काय करतेय, असा सवाल शेतकऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला.