निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती, तर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : आमदार असताना आपण निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती, तर आज पाटपाण्याला मुकावे लागले नसते. निळवंडेच्या पाणीसाठ्यावर श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुक्याचाही हक्क असल्याने पाणी उपलब्धतेचे दाखले घेवून शासकीय खर्चाने बांधलेले

प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, टाकळीभान, मुठेवाडगाव टेलटँकसह ओढ्यांवरील बंधारे, पाझर तलाव आदींसाठी शासनाच्या पाणी वाटप निर्णयातील तरतुदीनुसार निळवंडे धरणातील दोन टी.एम. सी. पाणी आरक्षित करावे, अशी मागणी माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

जायकवाडी धरणासाठी भंडारदरा व निळवंडे धरणातून ३.३६ टी.एम.सी. पाणी सोडण्याचे निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना मुरकुटे म्हणाले की, समन्यायी पाणी वाटप कायदा हा अन्यायकारक आहे. या कायद्यातील तरतूदीमुळे आजची बिकट स्थिती उदभवली आहे.

भविष्यात भंडारदरा लाभक्षेत्राचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. मी आमदार असताना निळवंडे धरण हे बिनकालव्याचे व्हावे, अशी आग्रही मागणी केली होती. पण ती निळवंडेचे लाभधारक असणाऱ्यांच्या राजकीय दबावामुळे मान्य झाली नाही.

निळवंडे आपल्या मागणीनुसार बिनकालव्याचे झाले असते, तर आपले भागाला १९.५ टी.एम.सी. पाणी उपलब्ध झाले असते. सन २००३ मध्ये समन्यायी पाणी वाटप कायद्याचे विधेयक आले तेव्हा मी आमदार असतो, तर हा कायदा संमत होवू नये, यासाठी प्रयत्न केले असते, असे मुरकुटे म्हणाले.

नुकतेच निळवंडेचे कालवे कार्यान्वित झाले आहेत. या धरणाचे पाणी अकोले, संगमनेर व राहाता तालुक्याला मिळणार असल्याने त्यांना लाभ होईल. तर श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुक्याचे नुकसान होणार आहे.

आजवर आपल्याला भंडारदरा धरणाचे ११. टी.एम.सी. व निळवंडेचे ८.५ टी.एम.सी. पाणी मिळून १९.५ टी.एम.सी. पाणी मिळत होते. पण निळवंडेचे कालवे कार्यान्वित झाल्याने निळवंडेचे मिळणारे ८.५ टी.एम.सी. पाणी कमी होणार आहे.

निळवंडेच्या पाण्याचा संगमनेर व राहाता तालुक्याना सर्वाधिक लाभ आहे. तर श्रीरामपूर तालुक्यातील दिघी या एकमेव गावाला निळवंडेचे पाणी मिळणार असल्याने श्रीरामपूर तालुक्याला निळवंडेचा काहिच फायदा नसून उलट नुकसान होणार आहे.

मुरकुटे यांनी पुढे नमुद केले की, नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार भंडारदरा धरणातून २ टी.एम.सी. व निळवंडे धरणातून १.३६ टी. एम.सी, असे एकुण ३.६ टी.एम.सी. पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार आहे.

याशिवाय खरीपासाठी वापर झालेल्या पाणीही हिशोबात धरले जाणार आहे. भंडारदऱ्यातून २ टी.एम.सी. पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार असल्याने आपल्या भागासाठी भंडारदऱ्याचे केवळ ९ टी.एम.सी. पाणी उपलब्ध असणार आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.