Ahmednagar Politics : मोदींचा घराणेशाहीवरून खुलासा ! विखे कुटुंबाबाबतच्या ‘त्या’ तर्कवितर्कांना फुलस्टॉप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना देशाला उद्देशून भाषण केले.

भाजप आपल्या तिसऱ्या टर्मकडे वाटचाल करत असून ३७० पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल असे सूतोवाच करत त्यांनी घराणेशाहीबाबत देखील एक वक्तव्य केले. हे वक्तव्य अनेकांना दिलासा आणि पाठबळ देणारे ठरले आहे.

दोन टर्ममध्ये केलेल्या विविध कामे मांडताना मोदी यांनी विरोधी पक्ष खास करून काँग्रेसला टार्गेट केले. यामध्ये मोदींकडून कधीकाळी काँग्रेसवर केला जाणारा परिवारवाद अर्थात घराणेशाहीवर होणारा आरोप विरोधकांकडून बुमरॅगं होत असल्याने मोदींनी तो पलटवून लावला. ते म्हणाले, एकाच कुटुंबातील अनेकांनी राजकारणात येणे चुकीचे नाही.

नवे, तरुण चेहरे राजकारणात यायला हवेत. एखाद्या कुटुंबात आपल्या क्षमतेच्या जोरावर आणि लोकांच्या पाठिंब्यावर कोणी राजकारणात प्रगती करत असेल तर त्याला आम्ही कधीच घराणेशाही मानत नाही.

मात्र जो पक्ष एकच कुटुंब चालवतो, त्या पक्षाचे सर्व निर्णयही एका कुटुंबातून चालवले जातात त्याला आम्ही घराणेशाही म्हणतो.

भाजपमध्येही अनेक कुटुंबात स्थानिक पातळीवर परिवारवाद वा घराणेशाहीचा ठपका दिसून येतो. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकाच कुटुंबात दोन व्यक्तींना उमेदवारी मिळेल का? अशा शंका पक्षातील काही नेते व्यक्त करतात.

मात्र मोदी यांनी संसदेत घराणेशाहीवर केलेली नवी व्याख्या पाहता राजकारणात परंपरागत पद्धतीने अनेक वर्ष असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

नगर जिल्ह्यातही अनेक राजकीय कुटुंबात परंपरेने घरातील चेहरे राजकारणात आहेत.

असे चेहरे सर्वच पक्षांत असले तरी लोकसभा निवडणूक पाहता एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे मंत्री पदावर असताना त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळेल का, अशी शंका विरोधकांसह स्वपक्षातील अनेक नेते आणि त्यांचे कार्यकर्ते खासगीत उपस्थित करतात. कोणी लॉबिंग आणि शिफारशी करून उपयोग नाही, अशीही वक्तव्ये येत होती.

मात्र आता मोदी यांनीच भाजपमधील एकूण परिस्थितीचा आढावा घेतलेला दिसून येतो. लोकसभेत जर भाजपला ३७० पेक्षा जास्त आणि एनडीएला ४०० पेक्षा अधिक जागा जिंकायच्या असतील तर अनेक ठिकाणी विद्यमान आणि सक्षम असलेल्यांना उमेदवारी द्यावी लागणार, अशी परिस्थिती आहे.

त्यामुळे घराणेशाही आणि एकाच कुटुंबात एकालाच पद असे करून चालणार नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी संसदेत गांधी घराण्यातील परिवारवाद आणि घराणेशाहीवर विरोध करत टीका केली असली तरी काँग्रेस आणि भाजपमधील परिवारवादातील स्वतंत्र विश्लेषण केले.