Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. आमदार काशीनाथ दाते यांनी पक्ष कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे त्यांनी सांगितले. महायुतीच्या युतीत निवडणुका लढवायच्या की स्वतंत्रपणे, याबाबत स्पष्टता नसली तरी पक्षवाढीवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ‘महाराष्ट्र स्वाभिमान मंगल कलश यात्रा’ सुरू झाली आहे. या यात्रेचा शुभारंभ उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला असून, ३० एप्रिल रोजी ती अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येणार आहे.
या यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार काशीनाथ दाते यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिक विधाते, अण्णासाहेब शेलार, प्रशांत गायकवाड, संजय कोळगे, क्षितिज घुले, संतोष धुमाळ, सुरेश बनसोडे, दत्तात्रेय पानसरे, आशाताई निंबाळकर, सचिन डेरे, अकुंश गर्जे, साईनाथ भगत यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवा
आमदार दाते यांनी सांगितले की, राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असून, जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून काम करावे, असे त्यांनी आवाहन केले. ३० एप्रिल रोजी येणाऱ्या स्वाभिमान मंगल कलश यात्रेचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
कलश यात्रेचा पारनेरमध्ये समारोप
जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी माहिती दिली की, स्वाभिमान मंगल कलश यात्रा शिर्डी येथे येणार असून, प्रवरा आणि गोदावरी नदीचे पाणी कलशात टाकले जाईल. तसेच, श्री शनिशिंगणापूर येथील मातीही कलशात समाविष्ट केली जाईल. आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयाजवळ या यात्रेचे स्वागत होईल आणि पारनेर येथे यात्रेचा समारोप होईल. या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार अनिल भाईदास उपस्थित राहणार आहेत.
यात्रेचे साध्या पद्धतीने स्वागत
शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू झाली आहे. माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने यात्रेचे स्वागत साध्या पद्धतीने होईल. आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयाजवळ नगर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वागत करतील. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. संजय कोळगे यांनी आभार मानले.