ठाकरेंनी ‘वर्षा’ सोडला तेव्हा महिला रडत होत्या, त्या अश्रूंमध्ये गद्दार वाहून जातील- संजय राऊत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नाशिक : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. अनेक विषयांवरुन सेनेमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. बंडखोरांनी रोखठोक भाष्य करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. संजय राऊत आज नाशिकमध्ये सभेसाठी गेले असून सभेमध्ये बोलताना बंडखोर आमदारांवर राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे.

‘शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं नाही, तुम्हाला ५० खोके पचणार नाहीत. तुम्ही आता शिवसेनेतून गेला आहात ना, मग तिकडे सुखाने राहा आणि आम्ही शिवसेना सोडली हे सांगा. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला हे बंडखोरांनी सांगून टाकावे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेनेपासून दूर गेल्यानंतर या आमदारांकडून अनेक कारणं सांगितली जात आहेत. मात्र त्यांनी घेतलेले पैशांचे खोके हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. बंडखोरांच्या या खोकेबाजीला आपण ठोकेबाजीने उत्तर देणार आहोत. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा महिला रडत होत्या, महिलांच्या त्या अश्रूंमध्ये गद्दार वाहून जातील, असे संजय राऊत म्हणाले आहेत.