India-Pakistan war : भारतासोबत तीन वेळा हरल्यानंतरही पाकिस्तानचा माज कमी झालेला नाही. 1948, 1965 आणि 1971 अशा तिन्ही युद्धात, पार्श्वभागाला पाय लावून पळालेला पाकिस्तान अजूनही सुधारलेला दिसत नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच… या म्हणीप्रमाणे पाकिस्तान अजूनही भारतात विघातक कृत्ये करताना दिसतोय. नुकताच पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मिरमधल्या पहलगाम येथे हल्ला केला. त्यात २६ निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला. या अमानुष घटनेनंतर भारतात संतापाची लाट उसळली.
त्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली. सध्या या दोन्ही देशांत कधीही युद्ध होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तरीही पाकिस्तानचा माज अजूनही तसाच आहे. पाकिस्तान कुणाच्या जिवावर एवढ्या उड्या मारतो? हा प्रश्न कायम पडतो. भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर दोन्ही देशांच्या सैन्याची ताकद किती? या दोन्हींच्या बाजूने जगातील देश किती? हाच विषय आज आपण समजून घेऊ..

भारतातून वेगळा झाल्यानंतर पाकिस्तानने भारतात काड्या करण्याचा धंदा आत्तापर्यंत सुरुच ठेवलाय. पाकिस्तानची हिच खुमखुमी भारताने आत्तापर्यंत तब्बल तीन वेळा काढली, मात्र तरीही भारतात दहशतवादाला खतपाणी घालून पाकिस्तान त्यांची जात दाखवत असतो. गेल्या दशकात भारत जगातील शक्तिशाली देशांच्या यादीत सामील झाला. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा खूपच मजबूत झाली.
त्याउलट पाकिस्तान सध्या रसातळाला गेला आहे. अन्न, वस्त्र व निवारा या नागरिकांच्या मुलभूत गरजाही या देशातला पूर्ण करता येईनात. स्वतः कर्जबाजारी होऊनही पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणं बंद करेना. पहलगाम हल्ल्यानंतर जगातील बहुतेक देश भारतासोबत उभे असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की युद्धादरम्यान कोणते देश भारताला पाठिंबा देऊ शकतात?
हे आपण पाहू.
या यादीत पहिला क्रमांक आहे अमेरिकेचा
अमेरिकेचा भारताशी विविध क्षेत्रात मजबूत संबंध आहे. दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहण्याची शक्यता जास्त आहे. पाकिस्तानबाबत अमेरिका पूर्वी जरी संमिश्र धोरण ठेवत होती, तरी ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तानातील उपस्थितीमुळे अमेरिकेचा विश्वास कमी झाला आहे. अलिकडच्या विशेष क्वाड अलायन्समुळे अमेरिका भारताच्या बाजूनेच उभा राहील, असे दिसते.
या यादीत दुसरा देश आहे रशिया
भारत आणि रशियाचे दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शस्त्रास्त्र खरेदीपासून ते राजनैतिक सहकार्यापर्यंत भारत-रशिया संबंध नेहमी मजबूत राहिले आहेत. १९७१ च्या युद्धात रशियाने भारताला खुला पाठिंबा दिला होता. भारताने रशियाकडून सुखोई-30, एस-400 सारखे शस्त्रास्त्रे खरेदी केली आहेत. रशिया भारताला अजूनही शस्त्रास्त्रे पुरवू शकतो.
या यादीत तिसरा देश आहे फ्रान्स
फ्रान्स भारताला राफेल लढाऊ विमाने आणि इतर लष्करी शस्त्रे पुरवत आहे. दोन्ही देशांमध्ये मजबूत संरक्षण करार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताशी दूरध्वनीवरून चर्चा केली. युद्धात फ्रान्स भारताला शस्त्रास्त्रे आणि राजनैतिक पाठिंबा देऊ शकतो.
या यादीत चौथा देश आहे इस्त्रायल
कारगिल युद्धकाळात इस्रायलने भारताला अत्यंत महत्त्वपूर्ण तांत्रिक सहाय्य दिले होते. नाईट व्हिजन तंत्रज्ञान, ड्रोन आणि लक्षवेधी क्षेपणास्त्रांसह अनेक अत्याधुनिक साधनांचा पुरवठा इस्रायलकडून करण्यात आला होता. सध्याही इस्रायल-भारत संबंध दृढ आहेत.
याशिवाय क्वाडचे सदस्य म्हणून जपान आणि ऑस्ट्रेलियाचे भारतासोबत मजबूत धोरणात्मक संबंध आहेत. चीनच्या प्रादेशिक आक्रमकतेला संतुलित करण्यासाठी दोन्ही देश भारताला पाठिंबा देतात. हे देश युद्धात भारताला राजनैतिक आणि आर्थिक मदत देऊ शकतात.
युएई आणि सौदी अरेबियाने अलिकडच्या काळात भारतासोबत आर्थिक आणि दहशतवादविरोधी सहकार्य वाढवले आहे. अलिकडेच युएईचे पाकिस्तानशी असलेले संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे देश युद्धात भारताला राजनैतिक आणि आर्थिक मदत देऊ शकतात.
तसेच भारताने अफगाणिस्तानमध्ये पायाभूत सुविधा आणि शिक्षणात मोठी गुंतवणूक केली आहे. तालिबान आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, अफगाणिस्तान भारताला प्रादेशिक गुप्तचर आणि राजनैतिक पाठिंबा देऊ शकतो, असेही सांगितले जाते.
आता आपण पाकिस्तानला कोण पाठिंबा देऊ शकते ते पाहू…
पाकिस्तानला मदत करणारा पहिला देश आहे चीन
चीन हा पाकिस्तानचा सर्वात मोठा लष्करी आणि राजनैतिक मित्र आहे. चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्रे आणि इतर लष्करी उपकरणे पुरवली आहेत. चीनने १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धांत थेट हस्तक्षेप करणे टाळले होते. यावेळीही चीन थेट हस्तक्षेप टाळेल असे सांगितले जाते. तथापी, चीन पाकिस्तानला शस्त्रे, ड्रोन आणि गुप्तचर मदत पुरवू शकतो.
पाकिस्तानला मदत करणारा दुसरा देश आहे तुर्की
अलिकडच्या काळात तुर्कीने पाकिस्तानसोबत लष्करी सहकार्य वाढवले आहे. सोशल मीडियावर असे वृत्त आहे की तुर्कीये यांनी पाकिस्तानला युद्ध साहित्य पाठवले आहे. युद्धात तुर्की पाकिस्तानला लष्करी उपकरणे आणि राजनैतिक पाठिंबा देऊ शकते.
याशिवाय इस्लामिक देशांची संघटना OIC पाकिस्तानला थेट मदत करु शकते. पाकिस्तान OIC मध्ये सक्रिय भूमिका बजावते. मलेशिया किंवा इराणसारखे काही मुस्लिम देश पाकिस्तानला राजनैतिकदृष्ट्या पाठिंबा देऊ शकतात. परंतु भारताशी असलेल्या या देशांच्या आर्थिक संबंधांमुळे ते उघडपणे युद्धात सामील होण्याची शक्यता कमी आहे.
हा सगळा विचार करता भारताच्या बाजूने उभे राहणाऱ्या देशांची संख्या आणि ताकद निश्चितच जास्त आहे. युद्ध झाले तर पाकिस्तानला चीनच्या पाठिंब्याशिवाय दुसरा आधार मिळणे कठीण आहे. जर चीननेही युद्धात तटस्थ भूमिका घेतली, तर पाकिस्तानला गंभीर नुकसान सहन करावे लागेल. अशा परिस्थितीत भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांचे परिणाम पाकिस्तानला नक्की भोगावे लागतील. याशिवाय पाकिस्तान शस्त्रास्त्रे, सैन्यदल, नौदल, हवाईदल या कोणत्याच बाबतीत भारताचा मुकाबला करु शकणार नाही. त्यामुळे एकदा युद्ध करुन पाकिस्तानची खुमखुमी ठेचून काढावी, अशीच अनेक भारतीयांची इच्छा आहे.