Mumbai News : तुम्हीही मुंबई ते अहमदाबाद दरम्यान प्रवास करता का ? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई ते अहमदाबाद प्रवास येत्या काही महिन्यात वेगवान होणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात बुलेट ट्रेनने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. दरम्यान, आता याच प्रकल्पाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. हा प्रकल्प नेमका कधीपर्यंत सुरू होणार याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिटेल माहिती दिली आहे.
काय म्हणालेत मुख्यमंत्री फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. 2028 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्यानंतर मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम रखडले होते मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली असून नियोजित वेळेत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

मुंबई अहमदाबाद प्रवास फक्त दोन तासात
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास अवघ्या दोन तासात करता येणे शक्य होणार आहे. प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा 508 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेनचा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणार आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा नगर हवेली या राज्यांमधून हा प्रकल्प जाणार असून यामुळे या संबंधित राज्यांमधील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. मुंबई – अहमदाबाद हा प्रवास फक्त दोन तास आणि सात मिनिटात पूर्ण होईल अशी सुद्धा माहिती यावेळी देण्यात आली आहे.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) या प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केले जात आहे. बुलेट ट्रेन बाबत बोलायचं झालं तर या ट्रेनचे तंत्रज्ञान जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित राहणार आहे. ही ट्रेन मुंबई अहमदाबाद हा प्रवास अवघ्या दोन तासांवर आणणार आहे कारण की या ट्रेनचा सर्वसाधारण वेग 320 किमी/तास इतका आहे. एवढेच नाही तर ही गाडी कमाल 350 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम आहे.
या देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्पाची महाराष्ट्रातील लांबी 154 किलोमीटर इतकी असून महाराष्ट्रात या प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर या चार ठिकाणी बुलेट ट्रेनची स्थानके विकसित केली जाणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प 2028 मध्ये सुरू होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली आहे मात्र या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील दोन वर्षात म्हणजेच 2027 मध्ये सर्वसामान्यांसाठी सुरू होईल असे म्हटले जात आहे.