Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन. ही गाडी पहिल्यांदा 2019 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून ही गाडी प्रवाशांमध्ये चर्चेत राहिली आहे. पहिल्यांदा या गाडीचे संचालन नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर झाले यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली.
आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची भेट मिळालेली आहे. मात्र वंदे भारत एक्सप्रेस मध्ये जे तिकीट दर आहे ते सामान्यांना परवडत नाही अशी टीका सुद्धा केली जाते.

दरम्यान हीच गोष्ट विचारात घेऊन भारतीय रेल्वे कडून वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस जिला अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन म्हणतात ती सुरू करण्यात आली. मात्र ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन अजूनही देशाच्या आर्थिक राजधानीतून धावत नाही.
पण लवकरच आर्थिक राजधानीतूनही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईला लवकरच आपल्या पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळणार असून या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण मुंबईमधील ही पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन कुठून कुठपर्यंत धावणार, या गाडीला कोणकोणत्या स्थानकावर थांबा मजूर होणार? याच बाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुंबईच्या पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा रूट
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बिहार राज्यातील सहरसा ते मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वेस्थानकादरम्यान लवकरच अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. बिहार राज्याला मिळणारी ही दुसरी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन राहणार असून ही गाडी मुंबईतील पहिलीच अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन असेल.
यामुळे मुंबई ते सहरसा असा प्रवास चार ते पाच तास लवकर होणार आहे. सध्या या दोन्ही शहरा दरम्यान इतर रेल्वे गाडीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास 35 तासांचा कालावधी लागतो मात्र अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली की हा प्रवासाचा कालावधी 30 तासापर्यंत कमी होणार आहे. या गाडीबाबत बोलायचं झालं तर ही नॉन एसी सुपरफास्ट ट्रेन आहे.
यामध्ये दहा स्लीपर आणि दहा जनरल डब्बे समाविष्ट करण्यात आले आहे. या गाडीचा वेग हा वंदे भारत एक्सप्रेस सारखाच आहे, ही गाडी जवळपास 110 ते 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असल्याचा दावा रेल्वेने केलेला आहे. या ट्रेनच्या दोन्ही टोकांना इंजिन आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
मुंबईच्या पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन बाबत बोलायचं झालं तर ही ट्रेन महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष फायद्याची राहणार नाही. कारण की या गाडीला महाराष्ट्रातील कोणत्याच रेल्वे स्थानकावर थांबा नाही ही गाडी थेट एलटीटी मधून सुटेल आणि बिहार मधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेत सहरसा जाईल.
तसेच सहरसा येथून रवाना झाल्यानंतर बिहारमधील महत्त्वाच्या स्थानकावर थांबा येईल आणि थेट मुंबई, एलटीटीवर येणार आहे. रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार या गाडीला समस्तीपूर, मुजफ्फरपूर, दानापूर, बक्सर आणि दीनदयाल उपाध्याय जंक्शन या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. एकंदरीत ही गाडी बिहार साठी आणि उत्तर भारतासाठी फायद्याची राहणार आहे.