माजीमंत्री मधुकरराव पिचड यांना एका मतदाराचे खुले पत्र…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मा.मधुकरराव काशिनाथ पिचड साहेबमा.मंत्री,आदिवासी विकास,महाराष्ट्र.
मा.आमदार.वैभव मधुकरराव पिचड साहेबअकोले विधानसभा सदस्य,महाराष्ट्र.

महोदय,
आदिवासिंच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणीकरण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती.

त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत झाला.

अकोले तालुका हा मतदार संघ आदिवासी(ST) राखीव आहे.अकोले तालुक्याच्या जनतेने आपल्या पदरात मतदान रुपी दान टाकून सलग ७ वेळा एक हाती सत्ता दिली.

१९८० – मधुकर पिचड, भारतिय राष्ट्रीय कॅांग्रेस

१९८५ – मधुकर पिचड, भारतिय राष्ट्रीय कॅांग्रेस

१९९० – मधुकर पिचड, भारतिय राष्ट्रीय कॅांग्रेस

१९९५ – मधुकर पिचड, भारतिय राष्ट्रीय कॅांग्रेस

१९९९ – मधुकर पिचड  (राष्ट्रवादी)

२००४- मधुकर पिचड (राष्ट्रवादी)

२००९- मधुकर पिचड (राष्ट्रवादी)

आपल्या गळ्यात नेहमीच विजयाची माळ टाकली व आपणास तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली.परंतु आपण तालुक्याला काय दिलं?

निसर्गाचं वरदान लाभलेला अकोले तालुका पाणीदार असतानाही आज ही आमच्या माता भगीणी ३-५ किमि अंतरावरून डोक्यावर दोन-दोन हांडे भरुन पायपीट करताना आज हि पहातो आहोत.त्यांच्या हतबलतेची कधी आपणा दया आली नाही.

भंडारदरा,निळवंडे,बलठन,अंबित,कोथळे,घोटी,पिंपळगावखांड,देवठान,येसनठाव पळसुंदे. या सारखी धरणं तालुक्यात असताना येथील “आदिवासी” भुमिपुत्रांच्या जमिनि कवडीमोल किंमतिने सरकारला देऊन त्यांना विस्थापित केलं,

परंतु त्याचं धरणांचं पाणी तालुक्यात न ठेवता दुसर्या तालुक्यांना व जिल्ह्यात हे पाणी आपन पाठवलं.”धरण उशाशी व कोरड घशाशी” अशी अवस्था आज तालुक्यात सर्वत्र दिसत आहे.

अकोले तालुका हा निसर्ग साैंदर्याने नटलेला असतानाही तालुक्यात “रंधा फॅाल” व्यतिरिक्त पर्यटनाचि गंगा तुम्हाला महाराष्ट्राच्या पटलावर ठसवता आली नाही.

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई,भंडारदरा धरण, हरिश्चंद्र गड, रतनगड, कुंजरगड, आजोबाडोंगर, सांदन दरी, तोलारखिंड, हि नाव गुगल वर सर्च केल्यावर समजतात परंतु पर्यटणाच्या दृष्टीने आपण या ठिकाणी कोणत्याही सोयीसुविधा करु शकले नाही.

आज जर हि महत्वाची स्थळं पर्यटनाने फुलली असती तर तालुक्यातील हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता परंतु आपण कधीही या  वास्तुंचा विचार केला नाही.हे तुमचं सर्वात मोठं अपयश आहे.

आज मि स्वता ३० वर्षाचा युवक आहे लहानपनापासुण पहातो आहे,राजुर-कोतुळ पासून कोथळे पर्यंत च्या डांगान भागातिल आदिवासी बांधव रोजगारासाठी (नारायनगाव,आळेफाटा,ओतूरला) ला मजुरिने जात आहे घरदार वार्यावर सोडून आठवड्याच्या बाजारासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च तो कसाबसा भागवत आहे

कधी या माझ्या माय-बापाच्या हातातील खुरपं कधी आपल्याला दिसलचं नाही.इतकं करूनही तालुक्यात चांगल्या प्रकारचं शिक्षण नाही .मोलमजुरी करुन शिक्षणासाठी पैसे जमवुनही योग्य शाळेत प्रवेश मिळत नाही कारण  हजारो रुपये फि भरायची दानत आमच्या आदिवासी बांधवांनमध्ये नाहि.(तुमच्या स्वतः च्या संस्थांमध्ये)

अकोले तालुक्यात एक ही शासकिय कृषी विद्यापीठ नाही,सर्व-सोई सुविधा असनारे हॅास्पिटल नाही,पासपोर्ट केंद्र नाही,आय.आय.टी कॅालेज नाही,एकही कारखाना नाही (अगस्ती सोडता), एक ही प्रायवेट कंपणी नाही (जिथे ५००लोक कामाला असतील) MIDC नाही,

अनेक गाव-वाड्यांना रस्ते नाहीत,शासकिय आश्रमशाळा काय अवस्थेत आहेत हे एकदा जवळून बघा,असा एकही रस्ता नाही कि तिथे खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आहे हेच कळत नाही.मग प्रश्न हाच पडतो की आपण आमच्या जिवावर सत्ता उपभोगली आमचा वापर केला.

आम्हाला मिळालं काय ? २०१४ ला आपले चिरंजीव वैभव पिचडांवर एक युवा म्हणून तालुक्यातील जनतेने विश्वास टाकला परंतु ते देखिल तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवत आले.

तालुक्यात रस्त्यांवर खड्यांचं साम्राज्य असताना दुसर्यांच्या मतदार संघाचे बॅनर हातात घेऊन विधान भवनाच्या दारावर आंदोलनं करताना सार्या तालुक्याने पाहिले परंतु अकोले तालुक्याचे प्रश्न विधानसभेत मांडताना वैभव पिचड कधि दिसलेचं नाही.

आदिवासिंचे हृदय सम्राट म्हणून घेणार्या पिचडांनी अकोले तालुक्यातील आदिवासिं बांधवासाठी काय योगदान दिलं याचा आता हिशोब आपनास द्यावाचं लागेल.

आज तुम्ही पक्षांतर केलं व बोलताना बोलून गेले महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही भाजपा मध्ये आलो अाहोत,परंतु ३५वर्ष सत्तेत असताना तुम्ही आमच्या अकोले मतदार संघाचा काय विकास केला याचं उत्तर आम्हा मतदारांना हवयं.

रोजगार हवाय पर्यटन हवय दर्जेदार शिक्षण हवय सुखसोई असलेली सुसज्य हॅास्पिटल हवय MIDC , सुसज्य वस्तिगृह हवीत. हक्काचं पाणी हवयं. पासपोर्ट केंद्र हवयं, तोलारखिड फोडुन मुंबईला जोडनारा हायवे हवाय. खड्डेमुक्त रस्ते हवेत

परंतु हे सर्व हवं असताना ४० वर्ष सत्तेत असताना तुम्ही देऊ शकला नाहीत त्या मुळे  या पुढे तुमच्याकडून या बद्दल अपेक्षा हि मुळीच नाही.

परंतु येणार्या विधानसभेत “परिवर्तन होणारच” व हे परिवर्तन अकोले तालुक्यातील मतदार घडवेल नविन चेहर्यांना संधी मिळेल व आम्हाला जे हवयं त्या मागण्या ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

हे बोलायची वेळ आपण आपल्या मतदारांवर का आणली? याचं आपण आत्मपरिक्षण कराल हीच एक अपेक्षा.

लेखक – सुनील वसंत भाद्रिके

Leave a Comment