आमदार संग्राम जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू, मात्र…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. जगताप धक्कातंत्र वापरून ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते.

त्यातच जगताप यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता शिल्पा गार्डन येथे पदाधिकारी व मोजक्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, हा मेळावा पक्षप्रवेशाचा नसून तो पक्षाचा आहे. राष्ट्रवादी हीच आपली भूमिका असल्याचे जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

आमदार जगताप हे शिवसेना अथवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, ही केवळ विरोधकांनी पसरवलेली अफवा असल्याचे जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

मात्र, त्यानंतरही जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा थांबली नाही. पितृपक्ष संपल्यानंतर जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. त्याबात सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्टही व्हायरल होत होत्या. त्यातच जगताप यांनी सोमवारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केल्याने पुन्हा उलटसुलट राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, हा मेळावा पक्ष प्रवेशासाठी नसून कोणत्याही अफवा पसरवू नयेत, राष्ट्रवादी हीच आपली भूमिका आणि धोरण असल्याचे जगताप यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून रविवारी स्पष्ट केले. जगताप यांच्या सोमवारी होणाऱ्या मेळाव्याकडे शहर मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. जगताप मेळाव्यात काय बोलतात याचीच उत्सुकता नगरकरांना आहे.

Leave a Comment