गोरखपूर : अयोध्येतील वादग्रस्त भूखंडासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या नियमित सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राममंदिराच्या मुद्यावर लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचे सूचक विधान केले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शनिवारी गोरखपूरस्थित चंपादेवी पार्कमध्ये मोरारी बापू यांच्या रामकथा वाचनाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील अयोध्या खटल्यात राममंदिराच्या बाजूनेच निकाल येईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

‘भगवान श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी आपल्याला त्यांच्या जीवनपटातून त्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळते. राम सर्वांच्याच घरांत व मनांत विराजमान आहेत.
त्यामुळे त्यांच्याविषयी लवकरच एखादी आनंदाची बातमी ऐकावयास मिळू शकते,’ असे ते म्हणाले. ‘१९९०च्या दशकात दूरदर्शनवर रामायण मालिका प्रसारित होत होती. ती खूप लोकप्रिय झाली. त्यावेळी भक्तीच देशाची शक्ती झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.
याच भक्तीचा प्रचार करण्यासाठी मोरारी बापू फ्रान्सला गेले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यांची रामकथा ऐकण्यास गेले होते. जगातील बहुतांश लोक त्यांची पावनकथा ऐकतात,’ असे योगी म्हणाले.
अयोध्येतील वादग्रस्त भूखंडाची सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठापुढे दैनंदिन आधारावर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी १७ ऑक्टोबरपर्यंत संपुष्टात येणार आहे.
- बँकेपेक्षा जास्त परतावा देतो” म्हणत शेअर मार्केटच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक
- शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळणे अभिमानास्पद ! मंत्री विखे पाटील यांचे गौरवोद्गार
- खाटूश्याम आणि तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर ! 14 जुलैपासून चालवली जाणार नवीन एक्सप्रेस, महाराष्ट्रातील कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ?
- निळवंडेच्या उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सुटणार : आ. कर्डिले
- जिथे रावणाचे विचार होते तिथे वारकऱ्यांमुळे प्रभू रामांच्या विचारांची पेरणी : आमदार डॉ. किरण लहामटे