अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी मला ताकद द्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी शहर : तालुक्यातील हक्काचे पाणी, जमीन ताब्यात राहाण्यासाठी, गोर- गरीबांना न्याय देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी, तुम्ही मला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी केले.

नवी पेठ येथे काल तनपुरे यांची सांगता सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने तनपुरे यांनी बाजार समितीपासून प्रचार फेरी काढली होती. या प्रचार फेरीत महिला, युवक कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रचारफेरीत बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, धनराज गाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर जाधव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

तनपुरे म्हणाले, माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विरोधी उमेदवारांची सभा झाली. तीत त्यांनी विरोधकांना उमेदवारच मिळेना, अशी टीका केली होती; पण मी जेंव्हा प्रचंड जनसमुदाय बरोबर घेऊन अर्ज दाखल केला, त्यानंतर मात्र त्यांच्या तंबूत घबराट निर्माण झाली.

राहुरी मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर तालुक्यातील मतांचे विभाजन होत आहे. त्याचा गैरफायदा घेऊन मतदारसंघातील जनतेला विकासाच्या नावाखाली स्वप्नांचा डोंगर उभा करून आमदार म्हणून निवडून येता येत होते.

कै. शिवाजीराजे गाडे व आमचे सुरुवातीला वैचारिक मतभेद होते, नंतर आम्ही एकत्र आलो, आता ते नसले तरी त्यांचा मुलगा धनराजच्या रुपाने ते आमच्या सोबतच आहेत. नगर, पाथर्डी तालुक्यात फिरताना आमदारांनी २५ वर्षे आमदार असताना काय केले, हे त्यांनी मतदाराना सांगावे, मग आम्ही २५ वर्ष प्रसाद तनपुरे यांनी काय केले, हे सांगतो.

आज तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगारी वाढली आहे. याकडे लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष नाही. मला संधी दिल्यास महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला प्राधान्य देइल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment