शेतकऱ्यांना एकरी २५ हजार नुकसान भरपाई द्या : मा. आ. स्नेहलता कोल्हे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोपरगाव :- पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली. सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हे यांनी मुंबईत भेट घेतली.

कोल्हे म्हणाल्या, बेमोसमी पावसामुळे तालुक्यातील ७९ गावांना फटका बसला. ६० हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. विमा कंपनीचा पीक कापणीचा कालबद्ध कार्यक्रम होऊन गेला आहे. कृषी विभागामार्फत पंचनामे व्हावेत, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.

त्याप्रमाणे नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी खात्यामार्फत सध्या सुरू आहे. मानवतेच्या भावनेतून सरसकट शेतकऱ्यांना एकरी २५ हजार नुकसानभरपाई दिली जावी जेणेकरून रब्बी पीक लागवडीस त्याचा उपयोग होईल.

सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, भुईमूग अतिवृष्टीमुळे जमीनदोस्त झाली आहेत. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त खरीप पिकांचे क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे जिल्हा बँक व अन्य बँकांमार्फत शेतकऱ्यांनी उतरवलेल्या विमा संदर्भात नुकसान याची माहिती विमा कंपन्यांना देण्यात आले आहे.

पावसामुळे ग्रामीण व शहरी भागातील, तसेच नगर मनमाड महामार्ग, नागपूर मुंबई द्रुतगती मार्ग यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

Leave a Comment