आ. रोहित पवार म्हणतात लवकरच सरकार अस्तित्वात येईल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जामखेड : स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय जनार्दन तथा भाई फुटाणे प्रतिष्ठानचा श्री संत नामदेव पुरस्कार हा सन्मानाचा पुरस्कार असून, तो जमनादास बजाज पुरस्काराप्रमाणेच आहे, त्यामुळे या पुरस्काराचा राष्ट्रीय पुरस्कारांत समावेश करावा, अशी मागणी कवी अशोक नायगावकर यांनी केली.

येथील महावीर मंगल कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय जनार्दन तथा भाई फुटाणे प्रतिष्ठानच्या वतीने श्री संत नामदेव पुरस्कार कवी कथाकार प्राचार्य भगवानराव देशमुख यांना प्रदान करण्यात आला, या वेळी नायगावकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

दरम्यान, लग्नानंतर भांडणे करण्यापेक्षा लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असल्यामुळे कॉमन चर्चा होणे आवश्यक असून, आमचे वरिष्ठ नेते अंतिम टप्प्यावर पोहचले आहेत. आमचं ठरलं असून, लवकरच सरकार अस्तित्वात येईल, असे स्पष्टीकरण आ. रोहित पवार यांनी राज़्यातील सध्याच्या राज़कीय घडामोडींवर दिले.

या वेळी माजी आमदार व ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, आ. रोहित पवार, आ. लहू कानडे, जागतिक मराठी अकादमीचे सदस्य सचिन ईटकर, कवी सुरेश शिंदे, साहेबराव ठाणगे, सतीश पिंपळगावकर, नितीन देशमुख, नारायण पुरी, अरुण पवार, भरत दौंडकर, प्रशांत मोरे, डी. के. शेख, अनिल दीक्षित, डॉ. महेश केळुस्कर, अरुण कोळपकर आदी उपस्थित होते.

या वेळी पुरस्कार विजेते प्राचार्य भगवानराव देशमुख यांनी, स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित झाल, हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले.

आपण मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. विकासाचा पॅटर्न कसा राबवणार, यावर आ. पवार म्हणाले, बारामतीच्या धर्तीवर या मतदारसंघाचा विकासाचा पॅटर्न निर्माण करणार आहे.

कवी रामदास फुटाणे यांनी, राज्यात काही गेल्या १५ दिवसापासून ज़े काय चालले आहे, त्यामुळे जनतेत नाराजी आहे. दूरचित्रवाणीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे वेगळेच चित्र निर्माण केले जात असून, हे पाहण्याचा लोकांना वीट आला आहे. बरं झालं घरचा टीव्ही आहे, नाहीतर तोसुद्धा फोडला असता, अशी मार्मिक टिप्पणी फुटाणे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर केली.

Leave a Comment