सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सामुहीक प्रयत्न करुनच पुढे जावे लागेल – शालिनीताई विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / लोणी :-  सहकारी साखर कारखानदारी ही आव्‍हानात्‍मक परिस्थितीतुन मार्गक्रमण करीत  आहे. अतिवृष्‍टी व नैसर्गिक आपत्‍तीमुळे कारखान्‍यांसमोर मोठा पेच नेहमीच  उभा राहातो. अडचणीवर मात करुन सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सामुहीक प्रयत्न करुनच पुढे जावे लागेल असे मत जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याचा सन २०१९-२० च्‍या ७० व्‍या गळीत हंगामाचा  सांगता समारंभ माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना कार्यस्‍थळावर संपन्‍न झाला याप्रसंगी सौ.विखे पाटील बोलत होत्‍या.

प्रसंगी कारखान्‍याचे व्‍हाईस चेअरमन विश्‍वासराव कडु, ट्रक सोसायटीचे चेअरमन जग्गनाथ राठी, डॉ.भास्‍करराव खर्डे, संचालक कैलास तांबे, कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, जि.प.सदस्या दिनेश बर्डे, संतोश ब्राम्‍हणे, साखर कामगार युनियचे अध्‍यक्ष ज्ञानदेव आहेर, विक्रांत विखे, प्रतापराव तांबे, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांच्‍यासह कारखान्‍याचे सर्व संचालक, कामगार मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

सौ.विखे पाटील म्‍हणाल्‍या की, पद्मश्रींनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना काढला आणि सामान्य शेतक-यांना नवी दिशा दाखवली. ही सहकार चळवळ आपण सर्वानीच सुरळीतपणे सुरु ठेवली  आहे. भरपुर अशी संकटे आपल्‍यावर आली तरीही या संकटांवर मात करण्‍यासाठी कामगार, शेतकरी बांधव यांचे मोठे सहकार्य मिळाल्‍यामुळेच कारखान्‍याची वाटचाल चांगल्‍या पध्‍दतीने सुरु असल्याचे त्यांनी  आवर्जून नमूद केले. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रत्‍येक गोष्‍टींचा बारकाईने अभ्‍यास केला त्‍यामुळेच मागील काळातही आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी कारखाना अडचणीतुन बाहेर काढला. कारखान्‍याच्या  संदर्भातील अडचणीवर  मात करण्यासाठी सदैव  यशस्वी प्रयत्न करीत असल्याचे  त्‍यांनी  सांगितले.

दुष्‍काळी परिस्थितीतही कारखान्‍याने चांगल्‍या पध्‍दतीने गाळप केल आहे. कारखान्‍याच्‍या संचालकांनी आपल्‍या कार्यक्षेत्रातील ऊसावर लक्ष केंद्रीत करुन एकरी जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन कशा पध्‍दतीने वाढविता येईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन करतानाच  कारखान्‍याच्‍या कार्यक्षेत्रात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली तर बाहेरुन ऊस आणण्‍याची कारखान्‍याला गरज भासणार नसल्‍याचे त्‍यांनी सूचित  केले.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील म्‍हणाले की, आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी चेअरमन या नात्‍याने कारखान्‍याचे धुरा हातात घेतली आहे. या गळीत हंगामात कारखान्‍यासमोर मोठ्या प्रमाणात आव्‍हान व अडचणी होत्‍या  त्‍यामुळे हा हंगाम अवघड गेला. अशाही परिस्थितीमध्‍ये सर्व सभासद शेतक-यांनी ऊस पिकविण्‍याचा प्रयत्‍न केला. सुरुवातीच्‍या काळात पाणी टंचाई व नंतरच्‍या काळात अतिवृष्‍टी यामुळे सर्वच कारखान्‍यांचे गाळप कमी झाले आहे. आव्‍हानात्‍मक व नैसर्गिक परिस्थितीवर मात करत डॉ.विखे पाटील कारखान्‍याने वेळोवेळी चांगले प्रयत्‍न केले असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगितले.  

या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्‍याच्‍यावतीने सौ.शालिनीताई विखे पाटील व माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संचालक कैलास तांबे यांनी केले तर आभार कारखान्‍याचे व्‍हाईस चेअरमन विश्‍वासराव कडु यांनी मानले. कार्यक्रमास कारखान्‍याचे सर्व संचालक, शेतकरी, सभासद, आधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment