हॅन्ड ग्लोव्हज, सॅनीटायझर तसेच मास्क खरेदीसाठी प्रत्येकी दहा लाख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि.२५ : कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या ग्रामीण भागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मार्फत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेची कामे सुरू आहेत.

या स्वच्छाग्रहींच्या सुरक्षिततेसाठी हॅन्ड ग्लोव्हज, सॅनीटायझर तसेच मास्क खरेदीसाठी   कोविड-१९ चा प्रादुर्भाव असलेल्या राज्यातील २७ जिल्ह्यांना प्रत्येकी दहा लाख याप्रमाणे  एकूण २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी ‘जागतिक बँक प्रोत्साहन अनुदान’ अंतर्गत देण्यात आला आहे.

या संदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

ग्रामपंचायतींची निवड करताना कोविड-१९ या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या ग्रामपंचायतीबरोबरच त्यांच्या नजीकच्या ग्रामपंचायती, प्रादुर्भाव झालेल्या शहरी ठिकाणांच्या शेजारील ग्रामपंचायती, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविलेल्या ग्रामपंचायती अशा ग्रामपंचायतींची निवड करावी. ग्रामपंचायत निवडीचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा राहील.

सध्या कोविड-१९ या आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या अहमदनगर, बीड, बुलडाणा, धुळे, गोंदिया, हिंगोली ,जळगाव, जालना, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ, औरंगाबाद, अमरावती, अकोला, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात हा निर्णय लागू आहे.

तथापि या जिल्ह्याव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास संबंधित जिल्ह्यांनाही पूर्व परवानगी घेवून सदर निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री.पाटील यांनी दिली.

मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठ्याकडे विशेष लक्ष

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यातील ग्रामीण भागात विशेष काळजी घेण्यात येत आहे.

मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात येत असून ग्रामपंचायत स्तरावर त्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दहा लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री श्री.पाटील यांनी दिली.

कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यात सर्वांना विशेषतः विलगीकरण केंद्र, रुग्णालये, दलित वस्ती, झोपडपट्टी, वृद्धाश्रम इत्यादींना मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा कसा होईल यादृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे, त्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजनादेखील करण्यात येत आहेत.

ग्रामपंचायतींची निवड करताना ज्या जिल्ह्यात कोविड-19 या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या ग्रामपंचायती, शहरी ठिकाणांच्या शेजारील ग्रामपंचायती, जिल्हाधिकाऱ्यांनी निवड केलेल्या ग्रामपंचायती अशा ग्रामपंचायतींची निवड करावी.

पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक रसायनांचा (ब्लिचिंग पावडर, सोडियम क्लोराइड, क्लोरीन टेबलेट्स) वापर केल्यानंतरच पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच ठराविक कालावधीनंतर पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक प्रमाणात रसायने तसेच जैविक पाणी गुणवत्ता चाचणी संच यांचा मुबलक पुरवठा असेल याची खात्री करावी.

या प्रक्रियेत अडथळा येणार नाही या दृष्टीने आवश्यकतेप्रमाणे रसायने तसेच पाणी गुणवत्ता चाचणी संचाची खरेदी करण्यात यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठ्याशी संबंधित सर्व  कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनीटायझर यांचा पुरवठा करावा अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही मंत्री श्री.पाटील यांनी दिली.

Leave a Comment