लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यात ८९ हजार गुन्हे दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि. २ : लॉकडाऊनच्या काळात दि. २२ मार्च ते १ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ८९,३८३ गुन्हे दाखल झाले असून १७,८१३ व्यक्तींना अटक करण्यात आली.

तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी १४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८२,१२८ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६२८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२४२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ५१,०१३ वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांवर हल्ला प्रकरणे

या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १७१ घटनांची नोंद  झाली असून  यात ६५७  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत.

या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने ५१ पोलीस अधिकारी व २९१ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २३ पोलीस अधिकारी व २६ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या २८ पोलीस अधिकारी व २६२ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झाले.

Leave a Comment