परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांची काळजी घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वाशिम, दि. १५ : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर परजिल्ह्यात, परराज्यात असलेले मजूर जिल्ह्यात परतले आहेत. या मजूरांची काळजी घ्या, त्यांची आरोग्य तपासणी करून योग्य मार्गदर्शन करा.

तसेच विलगीकरण कक्षात त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, राजेंद्र पाटणी, अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक,

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुंबई, पुणेसह इतर जिल्ह्यातून परतलेल्या मजूरांची संख्या मोठी असून त्यांना गावातील प्राथमिक शाळा अथवा इतर ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

ग्रामस्तरीय समितीमार्फत याबाबतचे नियोजन केले जात असून याठिकाणी मजूरांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच जे मजूर अजूनही जिल्ह्याबाहेर अडकलेले आहेत,

अशा मजूरांची जिल्हानिहाय यादी तयार करून सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून या मजूरांना जिल्ह्यात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात परतलेल्या मजूरांच्या हाताला भविष्यात काम उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जॉब कार्ड बनवून रोजगार देणे शक्य होईल का,

याबाबतचा आराखडा सादर करावा, असे पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला सांगितले. तसेच जिल्ह्यात परतलेल्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला तत्काळ धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात ‘सीसीआय’मार्फत सुरु असलेली कापूस खरेदी व ‘नाफेड’मार्फत करण्यात येत असलेली चना, तूर खरेदी अधिक गतीने होणे आवश्यक आहे.

तसेच नोंदणी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांचा कापूस व तूर खरेदीची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत पणन मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले.

यापूर्वी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होमगार्डच्या नेमणुकीचा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर हा प्रश्न निकाली निघाला असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. ठाकरे म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत पीपीई कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना सुद्धा अशा प्रकारे कोरोना विषाणूपासून बचावासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे.

खासदार गवळी म्हणाल्या, जिल्ह्यातील काही मजूर इतर राज्यात सुद्धा अडकलेले आहेत. त्यांना जिल्ह्यात परत येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

त्यासाठी संबंधित राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्यातील मजूरांना परत आणण्याची व्यवस्था करावी. ‘नाफेड’कडे प्रलंबित चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत सूचित करावे, असे त्यांनी सांगितले.

आमदार बाजोरिया यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आमदार निधीची रक्कम उपलब्ध करून देऊ, असे यावेळी सांगितले.

आमदार पाटणी म्हणाले, जिल्ह्यातील मोठा मजूर वर्ग इतर जिल्ह्यात व इतर राज्यात आहे. त्यापैकी अनेकजण जिल्ह्यात परतले असले तरी काही मजूर अद्यापही पुणे, मुंबई व सुरत या महानगरांमध्ये अडकलेले आहेत.

त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांसाठी चांगल्या दर्जाच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात.

‘सीसीआय’मार्फत होत असलेल्या कापूस खरेदीची गती वाढविण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

आमदार झनक म्हणाले, गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही रक्कम लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्यास आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मदत होईल.

जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजना, कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती याविषयी माहिती दिली.

Leave a Comment