धक्कादायक : 14 क्वॉरंटाईन सदस्यांनी ठोकली धूम !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  एकिकडे कोरोनाची लढाई प्रशासन शर्थीने लढत असून, दुसरीकडे मात्र क्वॉरंटाईन केलेल्या दोन कुटूंबातील तब्बल १२ ते १४ सदस्यांनी अक्षरश: धूम ठोकल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात दोन ठिकाणी घडल्या.

या दोन्ही घटना मंगळवारी (दि.१९) उघडकीस आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. तालुक्यातील केंदळ खुर्द येथील क्वॉरंटाईन एक जोडपे दुसऱ्याची मोटारसायकल घेवून आपल्या दोन लहान मुलांसह पळून गेले तर दुसऱ्या घटनेत संत गाडगेबाबा आश्रमात क्वॉरंटाईन केलेल्या बीडच्या कुटूंबाने धूम ठोकली.

दोन्ही घटनेप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, १५ मे रोजी केंदळ खुर्द येथील सेंट जोसेफ विद्यालय येथील शाळेत काहींना क्वॉरंटाईन करण्यात आले होते.

त्यात एका आदिवासी जोडप्याचा समावेश होता. ते जोडपे आपल्या दोन मुलांसह क्वॉरंटाईन होते. ते जोडपे २ लहान मुलांसह अचानक गायब झाले. मित्राची मोटार सायकल घेऊन ते पळून गेले असल्याचे तेथे ड्यूटीवर असलेल्या शिक्षकांच्या लक्षात आले.

त्यांनी सदर घटना गाव समितीला तत्काळ सांगितली. दरम्यान, त्याच रात्री क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये किरकोळ कारणावरुन शाब्दीक चकमकही उडाली असल्याचे बोलले जाते.

तसेच बीड जिल्ह्यातून आलेले एक कुटूंब राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळेत दि.१७ मे रोजी क्वॉरंटाईन करण्यात आले होते. सदर कुटुंबात ८ ते १० सदस्य होते. ते कुटूंब आज पहाटे अचानक कोणाची पूर्वपरवानगी न घेता निघून गेले.

राहुरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा रजि. नंबर ३६१/२०२० नुसार भादंवि १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कुटुंबात एकूण ८ ते १० जण असल्याचे समजते. त्यात एक ४ महिन्याचे लहान मूल होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालु्क्यात प्रशासनाने अतिशय कडक भूमिका घेतली आहे. प्रत्येक गावात बारकाईने लक्ष ठेवले जाते. म्हणूनच आज अखेर तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही.

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी प्रशासन, राजकीय नेते व नागरिक यांच्याशी चांगला समन्वय साधत असल्याने तालुका कोरोनामुक्त ठेवण्यात यश आले आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव समिती स्थापन करण्यात आली. बाहेर गावावरून कोणी आल्यास त्याची योग्य ती दखल घेतली जाते.

त्यांना क्वॉरंटाईन केले जाते. असे असताना ते क्वॉरंटाईने जोडपे पळूनच कसे गेले? असा सवाल केला जात आहे. सदर जोडपे कुठे गेले, याबाबत शोधा-शोध करण्याचे काम सुरु झाले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment