‘दूध व्यवसायालाही दराची शाश्वत हमी द्यावी’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील बळीराजा शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुधाचाच व्यवसाय करतो. यातूनच त्याची आर्थिक प्रगती साध्य होत असते.

परंतु सध्या दूध उत्पादकांची ससेहोलपट सुरु आहे. त्यामुळे त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे खूप मोठा धोका ओढवून घेतल्यासारखे आहे.

त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून साखर कारखानदारीसाठी दराची शाश्वत हमी (पॅकेज) दिली जाते, तसा निर्णय दुग्ध व्यवसायाबाबत घेतल्यास दुग्ध व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळेल.

त्यासाठी एक लाख कोटी कर्ज काढून शासनाने शेती व दूध व्यवसायाला मदत करावी, अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. त्यात पुढे म्हटले आहे,

कोरोना महामारीमुळे गेल्या चार ते साडे चार महिन्यांपासून दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री 20 ते 25 टक्क्यावर आली आहे. दुधाचे दर अस्थिर होऊन शेतकर्‍यांच्या दैनंदिन जीवनमानावर विपरित परिणाम होत आहे.

या समस्येचा विचार करून शासनाने दूध उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादित सर्व दुधावर प्रतिलिटर 10 रुपये प्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

दुग्ध व्यवसायाला संरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष व संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. परंतु सरकारकडून मात्र दखल घेतली जात नाही

येत्या 1 ऑगस्टपासून तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्वच पशुपालक व शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याने आंदोलनाची व्याप्ती प्रचंड राहील.

त्यातून उद्भवणार्‍या परिणामांचा विचार करुन शासनाने दोन दिवसांत दुधाच्या दरासंदर्भात व अनुदान देण्याबाबत निर्णय जाहीर करावा, अशी मागणी परजणे यांनी केली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment