सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अहमदनगरच्या या नेत्याची उडी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येने देशातील राजकारण ढवळून निघाले आहे.

या वादात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही उडी घेतली आहे. भाजपचा मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. या आरोपाचं खंडन राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं.

तर सुशांतसिंह प्रकरणात `राजकीय नेते, बॉलिवूड व अंडरवर्ल्डचाही संबंध` असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. ‘मुळात राज्य सरकारकडे काही लपवण्यासारखं नसेल तर सीबीआय चौकशीला परवानगी का दिली जात नव्हती? सत्य बाहेर आलंच पाहिजे. कुणा व्यक्तीच्या विरोधात आमची भूमिका नाही.

मात्र, या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. राजकीय नेते, बॉलिवूड व अंडरवर्ल्डचाही संबंध आहे. त्यामुळं राज्य सरकारनं सीबीआय चौकशीची मागणी मान्य करण्यास हरकत नव्हती. आता सीबीआयनं प्रकरण हाती घेतलंच आहे तर सत्य बाहेर येईल,’ असं आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

प्रकरणाची चौकशी सीबीआयला देण्याची मागणी भाजपनं सातत्यानं केली आहे. यावर शिवसेनेने भाजपावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, ‘सुशांतसिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीच्या प्रकरणात भाजपचा आक्षेप मुंबई पोलिसांवर कधीच नव्हता.

आमचा आक्षेप मुंबई पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावाला आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला आहे. डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाउंडेशनच्या वतीने विळदघाट येथे कै. श्रीमती सिंधुताई विखे पाटील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. त्याच्या लोकार्पण सोहळ्यानंतर ते बोलत होते.

‘मुंबईचं पोलीस दल हे जगातील एक उत्कृष्ट पोलीस दल आहे. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणालाही शंका नाही. राज्य सरकारकडून त्यांच्यावर येत असलेल्या दबावाला आमचा आक्षेप आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची जी वेगवेगळी विधानं समोर येताहेत, त्यामुळं देखील संशयाला जागा आहे, असं विखे म्हणाले.

‘कोणी कोणावर काय आरोप केलेत, याच्याबद्दल मला बोलायचं नाही. आपली पाटी स्वच्छ आहे असं सरकारला वाटत असेल तर सरकार भीती का बाळगते,’ असा प्रश्नही विखे यांनी केला. यापूर्वी महाराष्ट्रात अनेक प्रकरण झाली आहेत. जी मंडळी आज सत्तेत आहेत, त्यांच्या सोबत आम्ही अनेक बाबतीत सरकारकडे सीबीआयची मागणी करत होतो.

हे काही पहिल्यांदाच होत आहे असं नाही,’ असंही विखे म्हणाले. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यादाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या आरोपावर महाविकासआघाडीकडून काय उत्तर येतंय. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment