कोरोना पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचा जिल्हा दौरा, वाचा काय म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्ह्यातील ….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्यांची संख्या वाढवून बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने येत्या काळात भर द्यावा, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. तालुकापातळीवरील आरोग्य यंत्रणेला आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले असून ज्या बाधित रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत, त्यांनी कोविड सेंटर मध्ये उपचार घ्यावेत, जेणेकरुन आवश्यक रुग्णांना कोविड ह़ॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होऊ शकतील,असे आवाहन त्यांनी केले आहे. 

पुढील शंभर दिवसांसाठी नियोजन करुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी परिपूर्ण आराखड़ा तयार करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात कोरोना विषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सर्वश्री डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, मोनिका राजळे, डॉ. किरण लहामटे, रोहित पवार, लहू कानडे, आशुतोष काळे,  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखर्णा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ आणि महसूलमंत्री श्री. थोरात यांनी कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून जाणून घेतला. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी सादरीकरणाद्वारे कोरोना  उपाययोजनांसंदर्भातील जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आपल्या जिल्ह्यात आपण चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे बाधित संख्या वाढते आहे. मात्र, बाधित रुग्ण शोधण्यासाठी ही मोहिम अधिक गतीमान करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या यापुढील काळात वाढवावी, अनेक रुग्णांच्या बेडस मिळत नसल्याबाबतच्या तक्रारींचा उल्लेख करुन पालकमंत्री म्हणाले की, ज्या बाधित रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत, त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे लक्षणे जाणवणार्‍या आणि ऑक्सीजन अथवा व्हेंटिलेटरची आवश्यकता असणार्‍या रुग्णांना कोविड हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होऊ शकतील. तालुकास्तरावरील वैद्यकीय सुविधा बळकट करण्यासंदर्भात उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांचे म्हणणे मांडले. त्यावर,  या वैद्यकीय यंत्रणांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करुन दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा रुग्णालय अथवा तालुकास्तरीय यंत्रणा अहोरात्र या कोरोना संकटाशी झटत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी या सुविधा आवश्यक आहेत आणि त्यांच्या मागणीप्रमाणे त्या उपलब्ध करुन दिल्या जातील. जिल्ह्यात पुरेसा औषधपुरवठा होत असून गरज भासल्यास अधिक औषधसाठा उपलब्ध करुन दिला जाईल. रुग्णांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील बेड्सची संख्या, ऑक्सीजन सिलींडरची उपलब्धता याचा आढावा घेतला असून पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा कोठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात रुग्णांकडून काही खाजगी रुग्णालये अवाजवी बील आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेतली असून अशा अवाजवी शुल्क आकारणार्‍या खाजगी रुग्णालयांचे ऑ़़डिट केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णांच्या मृत्यू रोखण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनाच्या सोबत आहेत. सर्वंकष नियोजन करुन आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याची सूचना त्यांनी केली. आ. पवार यांनी काही रुग्णालये रुग्णांकडून जास्त शुल्क आकारत असल्याच्या आणि त्याची पावती देत नसल्याची तक्रार केली.

अशा रुग्णांलयांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी त्यांनी केली. यावर, महापालिका क्षेत्रात सहायक आयुक्त आणि तालुकास्तरावर सहायक कोषागार अधिकारी यांचे पथक तयार केल्याची माहिती प्रशासनाने दिली. आ. जगताप यांनी महापालिका क्षेत्रासाठी अधिक आरोग्य कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. आ. डॉ. लहामटे यांनी दुर्गम भागात अधिक आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत विचार व्हावा आणि त्यासाठी अनुषँगिक साहित्य मिळावे, अशी मागणी केली.

आ. राजळे यांनी तालुकास्तरावर ऑक्सीजन पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. आ. कानडे यांनी श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयासाठी सुविधा वाढविण्याची मागणी केली. आ. काळे यांनीही कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सुविधा निर्माण केल्या तर येथील जिल्हा रुग्णालयावरील रुग्णांचा ताण कमी होईल, असे सांगितले. आ. पाचपुते यांनी प्रशासन अधिक सतर्कतेने काम करीत आहे मात्र, यापुढील काळात तालुका पातळीवरही ऑक्सीजन बेड्स उपलब्ध असतील, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment