महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-   राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने पाण्याच्या भावात दुधाचे मोल करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे.

दुधाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे, असा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केला.

पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने महादूध एल्गार आंदोलनाची सुरुवात आमदार राजळे यांच्या नेतृत्वाखाली येथील पोस्ट कार्यालयातुन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र पाठवून करण्यात आली.

यात गाईच्या दुधाला ३० रुपये प्रति लिटर भाव द्यावा तसेच दुधाकरीता प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे व दुध भुकटीला ५० रुपये प्रति किलो प्रमाणे अनुदान द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे करण्यात आली.

यावेळी आमदार राजळे म्हणाल्या, कोरोना संसर्गामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याऐवजी राज्य सरकारने शेतकऱ्याला दुधाचे भाव कमी करून आणखी आर्थिक अडचणीत टाकण्याचे काम केले आहे.

पाण्याच्या बाटलीला २० रुपये मोजावे लागत आहेत तर एक लिटर दुधाला १८ रुपये भाव मिळत आहे त्यामुळे पाण्याच्या भावात दुधाचे मोल या सरकारच्या माध्यमातून झाले असल्याने

दुधाला भाव वाढ देऊन राज्यातील शेतकऱ्याला दिलासा देण्याचे काम या सरकारने करावे, असे आवाहन आमदार राजळे यांनी यावेळी केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment