अन्यथा यापुढे शांती मोर्चे नाही, तर आक्रमक मोर्चे समाजाकडून निघतील !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती प्रक्रिया करण्यात येऊ नये.

अन्यथा यापुढे शांती मोर्चे नाही, तर आक्रमक मोर्चे समाजाकडून निघतील, असा इशारा मराठा महासंघप्रणित शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला आहे. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना दहातोंडे बोलत होते. दहातोंडे म्हणाले,

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षण मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतकरी मराठा महासंघाच्या वतीने या विषयावर राज्य सरकारला दोषी ठरवत आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. राज्यसरकारने केंद्राशी समन्व्य साधून यातून मार्ग काढावा असे महासंघाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

शांती मोर्चे अनेक झाले, मात्र आता मराठा समाज प्रश्नावर वेगळ्या पद्धतीने रस्त्यावर येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. गृहमंत्री देशमुख यांनी मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवून पोलिस भरती करण्याचे वक्तव्य केले असले तरी, त्याला कायद्याच्या आधाराची गरज आहे.

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे जाणार आहे. तर तेथील निकाल येत नाही, तो पर्यंत भरती करु नये. ही भरती प्रक्रिया आत्ताच केल्यास मराठा समाजाचे नुकसान होण्याची शक्यता दहातोंडे यांनी वर्तवली आहे. मराठा आरक्षणासाठी निघालेले अभूतपूर्व मोर्चाचे नेतृत्व हे संपूर्ण समाजाने केले होते.

हा कोणत्या पक्षाचा विषय नाही. हा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे. या प्रश्नाला राजकारणाचे स्वरुप देऊन या लढ्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न कोणी करू नये. राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्व मराठा समाजाचे लक्ष लागून आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप न केल्यास समाज बांधव राज्यात मंत्र्यांना फिरु देणार नसल्याचा इशाराही दहातोंडे यांनी दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment