ऊस बिलाच्या थकबाकीबाबत आज सुनावणी होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-प्रसाद शुगर कारखान्याने २०१८-१९ हंगामात गाळप केलेल्या उसापैकी कार्यक्षेत्राबाहेरील उसाला २२१ रुपये कमी दर दिला. या प्रकरणी श्रीरामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचा निषेध करत कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होते.

तसेच याप्रकरणी शेतकरी संघटनेने केलेल्या तक्रारीवरून कारखान्याच्या मुख्य कार्यकारी संचालकांना म्हणणे मांडण्यासाठी २३ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश साखर संचालक (अर्थ) ज्ञानदेव मुकणे यांनी बजावले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी दिली.

पत्रकात म्हटले आहे, ऊस दर अदा करताना कायद्याने कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करता येत नाही. उच्च न्यायालयाचेही एकसमान ऊसदर देणे बंधनकारक असल्याचे आदेश आहेत. प्रसाद शुगरने गेल्या दोन वर्षांपासून श्रीरामपूर व नेवासे तालुक्यातील ऊस पुरवठादारांची प्रतिटन २२१ रुपयांप्रमाणे रक्कम अडकवून ठेवली आहे.

फरकाची थकीत रक्कम कायद्यातील तरतुदीनुसार १५ % व्याजासह चुकती करावी, यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारला. शेतकरी संघटनेने वेळोवेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर)अहमदनगर कार्यालयात, कारखाना कार्यस्थळावर व अखेर मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे राहुरी येथील निवासस्थानापुढे धरणे आंदोलन केले.

आंदोलनाची साखर आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून सोमवारी प्रसाद शुगरच्या कार्यकारी संचालकांना पूर्तता अहवालासह पुण्यातील साखर आयुक्तालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कारखान्यावर ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment