अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे जगावर आर्थिक संकट ओढवले आहे, आजही संपूर्ण जग या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.
जनता या आर्थिक संकटाला तोंड देत असताना सध्या राज्यात वाढीव वीजबिलांचा प्रश्न ग्राहकांना भेडसावत आहे. ग्राहकांकडून वीजबिलांची थकबाकी जमा केली गेली नसल्याने यामुळे महावितरण देखील आर्थिक संकटात सापडले आहे.
जिल्ह्यात सगळीकडेच हीच परिस्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच नेवासा तालुक्यातही अनेकांनी एप्रिलपासून वीजबिल न भरल्याने 23 हजार 184 थकबाकीदारांकडे तब्बल 30 कोटी 39 लाख 79 हजारांची थकबाकी झाली आहे.
कोरोना संकटात सुरवातीला सरासरी बिले दिली गेली होती. अनेकांनी ही बिले भरली देखील; मात्र नंतर आलेले बिल ग्राहकांना शॉक देणारे ठरले.
महावितरणच्या नेवासा व घोडेगाव विभागात घरगुती, वाणिज्य, औद्योगिक तसेच शहरातील पथदिवे व सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे तब्बल 30 कोटी 39 लाख 79 हजारांची थकबाकी झाली आहे.
त्यात नेवासा विभागांतर्गत वरील वर्गवारीनुसार 13 हजार 894 ग्राहकांकडे 22 कोटी 89 लाख 20 हजार, तर घोडेगाव विभागात 9 हजार 290 ग्राहकांकडे 9 कोटी 60 लाख 79 हजार रुपयांची थकबाकी आहे.
वीजबिल माफी मिळेल या आशेवर अनेकांनी बिले भरलीच नाहीत. त्यामुळे तब्बल 23 हजार 290 ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी आहे.
वीजमीटरची तपासणी न करणे, परस्पर रिडींग टाकणे, ग्राहकांना वीजबिल वेळेवर न देणे, या गोंधळामुळे बहुतांश ग्राहकांच्या मानगुटीवर हे वाढीव बिलाचे भूत बसले असल्याची चर्चा आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved